भाजप प्रवक्ते यतिश नाईक कडून स्पष्ट
प्रतिनिधी /पणजी
काँग्रेस पक्षात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींशी भारतीय जनता पक्षाचा काहीच संबंध नाही, असे पक्षप्रवक्ते यतिश नाईक यांनी म्हटले आहे. ’काँग्रेसचा हात आणि काँग्रेसच करून घेत आहे स्वतःचा घात’, असी टीपण्णीही त्यांनी केली.
सोमवारी पक्षाच्या पणजी कार्यालयात आयोजित पत्रकार परिशदेत ते बोलत होते. रविवारी दिवसभरात झालेल्या राजकीय घडामोडी हा काँग्रेस पक्षामधील अंतर्गत मतभेदांचा भाग होता. त्यात भाजपचा कोणताही हस्तक्षेप नव्हता. त्यामुळे आम्ही काँग्रेसमध्ये फूट पाडत आहोत, असे लेबल कुणी लावू नये, असे ऍड. नाईक म्हणाले.
काँग्रेसचे बंडखोर आमदार मुख्यमंत्र्यांना भेटले होते का? या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी, सध्या विधानसभा अधिवेशन सुरू असल्यामुळे अनेक आमदार मुख्यमंत्र्यांना भेटत आहेत. आपल्या मतदारसंघाशी संबंधित विकासकामे, साधनसुविधा संबंधी प्रस्ताव, मागण्या घेऊन ते येतात. ते काल आले, उद्याही येतील. याचा अर्थ भाजप किंवा सरकार काँग्रेसच्या अंतर्गत बाबीत ढवळाढवळ करत आहे, असा होत नाही. काँग्रेस पक्षात जे काही चालले आहे, तो त्यांचा अंतर्गत मामला. त्याच्याशी भाजपचा काहीच संबंध नाही, असे ऍड. नाईक यांनी पुढे सांगितले.