दीपक केसरकर हे आता या फितूर गटाचे प्रवक्ते- डाॅ. जयेंद्र परुळेकर
सावंतवाडी/प्रतिनिधी-
बाळासाहेब हे पवित्र नाव सुर्याजी पिसाळाच्या अवलादीने उच्चारणं हा सामान्य शिवसैनिकाचा आणि मतदार राजाचा अपमान आहे अशी टीका शिवसेनेचे जिल्हा प्रवक्ते डाॅ. जयेंद्र परुळेकर यांनी बंडखोर एकनाथ शिंदे गटावर केली आहे .बंडखोर आणि फितूर शिंदे गटातील आमदार हे खरं तर उभ्या महाराष्ट्रात उफाळून आलेल्या सच्चा शिवसैनिकांच्या उद्रेकामुळे हादरलेले दिसत आहेत. फंदफितूरी करणाऱ्यांना शिवछत्रपतींच्या महाराष्ट्र राज्याच्या इतिहासात तर कधीही स्थान नव्हतंच पण वर्तमानात आणि भविष्यातही काडीची किंमत मिळणार नाही.
महाराष्ट्रातील होत असलेल्या कट्टर शिवसैनिकांच्या आणि सामान्य जनतेच्या तीव्र भावना बघता आता शिंदे गटातील फितूर आमदार टोळीने आपल्या गटाचे नाव आता “शिवसेना बाळासाहेब” असं ठेवण्याचं नाटक रचलेलं आहे. बाळासाहेब हे पवित्र नाव सुर्याजी पिसाळाच्या अवलादीने उच्चारणं हा सामान्य शिवसैनिकाचा आणि मतदार राजाचा अपमान आहे ही सगळी उठाठेव सदर फितूरांचा गट भाजपमध्ये विलीन करून देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी आहे हे उघड आहे. कारण पक्षांतर बंदी कायद्याच्या शेड्युल १० च्या ४ क्रमांकाच्या अधिनियमानुसार बंडखोर गटाला कुठल्यातरी पक्षात विलीन होणे आवश्यक आहे अन्यथा त्या गटातील आमदारांची आमदारकी रद्द होऊ शकते म्हणजे दिखावा करायला गटाचे नाव “शिवसेना बाळासाहेब” ठेवायचं आणि कमळ हातात घेऊन मंत्रीपद लाटायचं हाच खरा उपक्रम आहे.
यासाठीच सुरत आणि गुवाहाटी येथील फाइव् स्टार टुरिझम भाजपने प्रायोजित केलेला आहे. दिपक केसरकर हे आता या फितूर गटाचे प्रवक्ते झाल्याचे कळते. तीन वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवाराविरोधात (विद्यमान भाजप जिल्हाध्यक्ष) सावंतवाडी मतदार संघातील सामान्य जनतेने मोठ्या विश्वासाने केसरकरांना निवडून दिलं. आता फितूरी करून दगाफटका देऊन भाजप मध्ये विलीन होण्याची ही मंत्री आणि पालकमंत्री पद लाटण्यासाठी चाललेली त्यांची धडपड कोकणातील जनता बघत आहे.
सावंतवाडी विधानसभा क्षेत्रातील मतदार जनता ह्यांना माफ करेल का? असा सवाल परुळेकर यांनी विचारला आहे.