अध्याय विसावा
भगवंत म्हणाले, उद्धवा प्रेमाने माझे भजन करत असता संसारभयाचे बंधन रहात नाही. माझा भक्त माझ्या भजनामध्ये सुख, दुःख हे दोन्ही विसरतो. माझ्याशिवाय त्रिभुवनात दुसरे काही त्याला दिसतच नाही पण अशा प्रकारची माझी अनन्य भक्ती करू म्हणून करता येत नाही हेही लक्षात ठेव. जेव्हा मी प्रसन्न होतो, तेव्हाच दैवयोगाने ती प्राप्त होते. मला प्रसन्न करून घ्यावयाला हा नरदेह हेच कारण आहे. स्वर्गातील देव आणि नरकातील लोकसुद्धा या मनुष्यदेहाची इच्छा करतात कारण हे शरीरंच ज्ञान किंवा भक्ती यांचे साधन आहे. नरदेह हा अत्यंत पवित्र असून भक्तीचे आणि ज्ञानाचे तो आश्रयस्थान आहे. ह्या नरदेहामुळेच जन्ममरण निखालस खुंटून जाते, जीव समाधान पावतो आणि स्वतः स्वानंदघन होतो. स्वर्ग किंवा नरक हे कसे अडचणीचे ठरतात ते सांगतो. स्वर्ग मिळाल्याने पुनर्जन्माच्या फेऱयात पडावे लागते आणि नरकामध्ये तर दुःसह दुःख भोगावे लागते. याकरिता या दोघांचेही प्रेम सोडून नरदेहाची प्रीती धरावी. त्यातही असा विचार आहे की, मनुष्यदेहाची आवड झाली तरी ती देहबुद्धीच होय. हिच्यामुळे कामक्रोधांची जोड होते आणि क्षणोक्षणी असंख्य प्रमाद घडतात. ह्याकरिता स्वर्ग, नरक किंवा मृत्युलोक ह्यांचीही प्रीती सोडून देऊन ज्ञान किंवा भक्तिच अवश्यमेव संपादन करावी. ज्ञान संपादन करण्यासाठी आपल्याला विशेष कष्ट सोसण्याचे कारण नाही. प्रेमाने माझे भजन केले असता ज्ञानाला ढकलून घातले तरी ते घरात शिरतंच. गव्हाच्या राशी हातात आल्या म्हणजे त्यापासून पाहिजे ती पक्वान्ने करता येतात. त्याप्रमाणे माझी भक्ती हाती आली की, ज्ञानसंपत्ती घरात शिरते.
आपल्या हातात पैसा असला म्हणजे सारे पदार्थ घरबसल्या चालत येतात, त्याप्रमाणे माझी भक्ती साध्य केली म्हणजे भुक्ति आणि मुक्ति दोन्ही दासी होऊन राहतात. हे ऐकून कदाचित तू म्हणशील की, माझी भक्ती करू लागले असता छळ करण्याकरिता विघ्ने आड येत असतात. पण हे खरं नाही कारण मी हातामध्ये सुदर्शन घेऊन माझ्या भक्तांचे रात्रंदिवस संरक्षण करीत असतो. ह्याकरिता नरदेह प्राप्त झाला असता जो माझे भजन करतो, तोच खरोखर उद्धवा! ह्या संसारामध्ये धन्य होतो, हे लक्षात ठेव. मनोभावाने माझी भक्ती केली असता मी श्रीकृष्ण त्या भाविकाचा उद्धार करतो आणि जे कोणी ज्ञानाभिमानाने चढून जातात, त्यांना मी यमाच्या हातात देतो. आता उद्धवा! तू कदाचित् असे विचारशील की, त्यांना यमाच्या हातात का देता? तर ते एवढय़ाकरिताच की, ज्ञानी मंडळींना ज्ञानाचा अभिमान वाटत असतो. यम त्या महादोषी जनांचा छळ करून तो ज्ञानाभिमानापासून त्यांना सोडवितो. ह्याकरिता देहाभिमान सोडून भक्तिभावाने माझे भजन करूनच पूर्वीचे ज्ञानसंपन्न साधु नरदेहानेच माझ्याप्रत येऊन पोचले आहेत. या शरीराला मरण असूनही ते परमात्मप्राप्ती करून देणारे आहे, असा विचार करून माणसाने सावधपणे मृत्यू येण्यापूर्वीच पुनर्जन्म टाळण्याचा प्रयत्न करावा. तसं बघितलं तर देह म्हणजे केवळ अस्थि, चर्म व मळमूत्र ह्यांचाच झालेला असल्यामुळे अत्यंत अमंगल होय परंतु त्याने परिपूर्ण व निश्चळ अशा ब्रह्माचे निर्मळ फल प्राप्त होते.
पूर्वीच्या ज्ञानसंपन्न लोकांनी नरदेहाचे कारण लक्षात आणून देहाभिमान सोडून ब्रह्मसुख प्राप्त करून घेतले. देह हा निंद्य आहे म्हणून सोडून द्यावा, तर एवढा लाभ हातचा दवडावा लागेल, बरे तो वंद्य म्हणून त्याचा प्रतिपाळ करावा, तर निश्चयेकरून रौरव नरकाला जावे. ह्याकरिता देहाचा तिरस्कारही करू नये व फारसा आदरही करू नये. तर त्याच्याकडून परमार्थसाधन करून घ्यावे. उद्धवा! ते कसे साध्य करावे ह्यातील गुप्त रहस्य तुला सांगतो. नीट लक्ष देऊन श्रवण कर. ज्या देहाच्या योगाने संसारभाव वाढतो, त्याच देहामुळे संसाराचाच अभावही होऊन जातो, मात्र अहंभाव सोडला पाहिजे. पूर्वीचे ज्ञानसंपन्न साधु देहाभिमान सोडण्याकरिता नित्य जागृती ठेवूनच मत्स्वरूप पावून ब्रह्मरूप होऊन गेले.
क्रमशः