आरपीडी महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिन साजरा
प्रतिनिधी /बेळगाव
निसर्ग ही फार मोठी शक्ती आहे. आपण सर्वांनी त्याची योग्य ती काळजी घ्यायला हवी. देश हे आपले पहिले प्राधान्य. त्यामुळे निसर्ग आणि आपला देश यांच्या संवर्धनासाठी आपण जाणीवपूर्वक प्रयत्न करायला हवेत, असे प्रतिपादन आरोग्य भारतीचे जिल्हाध्यक्ष डॉ. मिलिंद हलगेकर यांनी केले. आरपीडी महाविद्यालय बेळगाव आणि आरोग्य भारती बेळगाव शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. आरोग्य भारतीचे बेळगाव शाखाप्रमुख डॉ. मिलिंद हलगेकर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
आरपीडी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शोभा नाईक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. जन्मदाती माता आणि पर्यावरण हे प्रत्येकाच्या जिव्हाळय़ाचे विषय आहेत. या दोन्हींचीही काळजी घेणे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे, असे त्या म्हणाल्या.
महाविद्यालयाच्या भूगोल विभागामार्फत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विभागप्रमुख आणि महाविद्यालयाच्या आयक्मयुएसीचे प्रमुख डॉ. अभय पाटील यांनी स्वागत केले. या निमित्ताने वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे- वैष्णवी मंगनायक (मराठी), मुस्कान होसळ्ळी (कन्नड), निशा सलधना (इंग्रजी).
या विजेत्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. प्रा. डॉ. एस. आय. कितली यांनी स्पर्धा यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. डॉ. मिलिंद हलगेकर, हणमंत हरोळी, डॉ. एम. एम. कुरणी यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. आरोग्य भारतीचे पदाधिकारी व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.