भाजीमार्केट गाळे परिसरात बांधकामास प्रतिबंध : हेरिटेज पार्क म्हणून विकसित करा
प्रतिनिधी /बेळगाव
किल्ला परिसराला पुरातत्व खात्याने ऐतिहासिक वारसा म्हणून घोषित केले आहे. त्यानुसार ऐतिहासिक वारसा लाभलेल्या किल्ला आणि परिसराचे संरक्षण करणे बंधनकारक आहे. त्यामुळे भाजीमार्केट गाळय़ांच्या आवारात कोणत्याही प्रकारचे व्यवसाय किंवा बांधकाम करण्यात येऊ नये, स्मार्ट सिटी योजनेंतर्गत किल्ला परिसराचा विकास करण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन बेळगाव कॅन्टोन्मेंट रहिवासी संघटनेच्यावतीने कॅन्टोन्मेंट बोर्डला देण्यात आले आहे.
किल्ला येथील कॅन्टोन्मेंट होलसेल भाजीमार्केटचे स्थलांतर झाल्यानंतर तब्बल दोन वर्षांनी भाजीमार्केटच्या गाळय़ांचा ताबा सोडण्यात आला आहे. त्यामुळे या ठिकाणी गाळय़ांची उभारणी करून किंवा व्यापारी संकुल उभारण्याचा प्रस्ताव आहे. मात्र, सदर परिसर ऐतिहासिक वारसा म्हणून घोषित करण्यात आल्याने किल्ला परिसरात कोणत्याही प्रकारचे बांधकाम करण्यात येऊ नये, अशी मागणी करण्यात आली आहे.
परिसराचे जतन करणे आवश्यक
किल्ला परिसर ऐतिहासिक वारसा म्हणून राज्य सरकारने दि. 30 सप्टेंबर 2014 रोजी जाहीर केले आहे. त्यामुळे पुरातत्व खात्याच्या नियमानुसार किल्ला व परिसरातील जागेत प्रवेशबंदी आहे. या परिसराचे जतन करण्याच्यादृष्टीने आवश्यक उपाययोजना राबविणे गरजेचे आहे. मात्र, सदर जागेचा दुरुपयोग होत आहे.
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत हेरिटेज पार्कसाठी प्रस्ताव
महसूल वाढीच्यादृष्टीने 1981 मध्ये या ठिकाणी गाळय़ांची उभारणी करून कॅन्टोन्मेंट होलसेल भाजी मार्केटला भाडेतत्त्वावर देण्यात आले होते. पण येथील व्यावसायिकांनी भाजीचा कचरा किल्ला परिसरातील खंदकात टाकण्यास प्रारंभ करून किल्ला परिसराची हानी केली आहे.
येथील किल्ल्यासभोवती असलेल्या खंदकात कचरा टाकल्याने खंदक पूर्णपणे तुंबले आहे. हा परिसर सध्या खूपच धोकादायक बनला असून, कचऱयामुळे प्रदूषण निर्माण झाले आहे. मात्र, येथील भाजीमार्केटचे स्थलांतर करण्यात आल्याने परिसर मोकळा झाला आहे. पण या परिसरात व्यापारी संकुल उभारण्याच्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. मात्र राज्य शासनाने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे बांधकाम करण्यास प्रतिबंध आहे. किल्ला आणि येथील परिसर हेरिटेज पार्क म्हणून विकसित करण्यासाठी स्मार्ट सिटी योजनेंतर्गत प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या प्रस्तावाची अंमलबजावणी करण्याच्यादृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे आहे.
किल्ल्याजवळच मध्यवर्ती बसस्थानकाची उभारणी करण्यात आली आहे. त्यामुळे या परिसराचा हेरिटेज पार्क म्हणून विकास करण्यात आल्यास शासनाला आणि नागरिकांना फायदा होण्याची शक्मयता आहे. त्यामुळे याचा विचार कॅन्टोन्मेंट बोर्डने करावा, असे निवेदन कॅन्टोन्मेंट रहिवासी संघटनेच्यावतीने देण्यात आले आहे.