ऑनलाईन टीम / तरुण भारत :
त्र्यंबकेश्वर मंदिरातील संदलची प्रथा शंभर वर्षे जुनी असेल तर ही परंपरा मोडीत काढणे योग्य नाही. त्र्यंबकेश्वरमधील नागरिकांनी यासंदर्भात निर्णय घ्यायला हवा. बाहेरच्यांनी यात नाक खुपसण्याची गरज नाही, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
राज ठाकरे आजपासून दोन दिवसीय नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यांनी नाशिकमधून माध्यमांशी संवाद साधला. राज ठाकरे म्हणाले, त्र्यंबकेश्वर मंदिरात जर संदलची वर्षांनुवर्षांची परंपरा चालत असेल तर ती थांबवण्यात काही अर्थ नाही. हा तिथल्या प्रशासनाचा आणि स्थानिकांचा प्रश्न आहे. देशभरात अशी अनेक मंदिरे, मशिदी आहेत जिथे हिंदू-मुस्लिमांचे ऐक्य आढळून येतं. इतर धर्माचा माणूस आपल्या मंदिरात आला म्हणून आपला मंदिर आणि धर्म भ्रष्ट होईल, इतका आपला धर्म कमकूवत नाही.
झालेल्या घटनेवर गावकरी आणि स्थानिक प्रशासनाने निर्णय घ्यावा. या घटनेच्या माध्यमातून कुणाला दंगली हव्या आहेत का? ज्या गोष्टी चुकीच्या घडतील, तिकडे प्रहार करणे गरजेचे आहे, असेही राज ठाकरे म्हणाले.