पुणे / प्रतिनिधी :
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटनेबाबत काही तक्रारी आल्याने तसेच राष्ट्रीय कुस्तीगीर संघटनेने आयोजित केलेल्या स्पर्धेबाबत राज्य संघटनेने टाळाटाळ केल्याने संघटना बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. अशाप्रकरारे खेळात राजकारण आणणे योग्य नाही, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. आजवर खेळाडूंना मदत करण्यावरच आपला भर राहिला असून, या निर्णयांचा खेळाडूंवर कोणताही परिणाम होऊ देणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
याबाबत बोलताना पवार म्हणाले, अखिल भारतीय कुस्तीगीर संघटना यांच्याकडून महारष्ट्र कुस्तीगीर संघटना यांच्याकडून कारवाई करण्यात आली आहे. त्यांना प्रशासकीय निर्णय घेण्याचा अधिकार आहे. काही तक्रार, कमतरता राज्य संघटनांबाबत असू शकतात. मात्र, हा पर्याय नव्हे. मी राज्य कुस्तीगीर संघटनेचा मी अध्यक्ष असलो, तरी खेळ स्पर्धा आयोजित करणे, खेळाडूंना मदत करणे, त्यांना चांगल्या सुविधा, प्रशिक्षण मिळवून देणे, यासाठी साह्य केले. राहुल अवारे, अभिजित कटके, उत्कर्ष काळे आदी खेळाडूंचा खेळ आणखी चांगले होण्यासाठी त्यांना मदत केली. काही खेळाडूंना वैदकीय मदत केली. त्याचबरोबर देशात आणि इतर ठिकाणी मी महत्त्वपूर्ण संघटनांमध्ये यापूर्वी काम पाहिले आहे. खो खो संघटना, क्रिकेट संघटना, बीसीसीआय संघटना यात मी आंतरराष्ट्रीय स्तरावर काम पाहिले आहे. खेळाडूंच्या मागण्या, त्यांची निवड त्याबाबत मी कामकाज, बैठक केल्या आहे. विविध खेळांच्या संघटना यांचे काही प्रश्न असतात आणि ते सरकार पुढे मांडण्यासाठी मी पदाधिकारी म्हणून काम पाहिले आहे. खेळाडूंचे निवृत्तीनंतरही काही प्रश्न असतात, ते सोडवण्यासाठी मी काम करतो. शासकीय, निमशासकीय, खासगी संस्थात खेळाडूंना काम मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न केले आहेत.
खेळात आम्ही कधी राजकारण आणत नाही. आजमितीला अनेक राजकीय नेते विविध खेळाच्या संघटनांवर काम करत आहे. राज्य कुस्तीगीर संघटनांच्या विरोधात कारवाई झाली असली, तरी त्याचा परिणाम कोणत्याही खेळाडूवर होणार नाही, याची काळजी आम्ही आगामी काळात घेऊ, असेही पवार म्हणाले.