प्रतिनिधी/ रत्नागिरी
गेल्या 10 दिवसांपासून माजी पंचायत समिती सभापती स्वप्नाली सावंत यांच्या बेपत्ता प्रकरणाची व त्याविषयी रंगलेल्या घातपात संशयाच्या जोरदार चर्चेला उधाण आले होते. पण या प्रकरणाचे निर्माण झालेले गूढ रत्नागिरी पोलिसांनी मोठय़ा कौशल्याने उकलले असून त्यात आता धक्कादायक खुलासा झाला आहे. रत्नागिरी पंचायत समितीच्या माजी सभापती स्वप्नाली सावंत यांना जाळून मारल्याची हादरवून टाकणारी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. या प्रकरणी शहर पोलिसांनी तिच्या पतीसह 3 जणांना 11 सप्टेंबर रोजी सकाळी अटक केली. तिघांना न्यायालयासमोर हजर केले असता 19 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घातपात प्रकरणात स्वप्नाली यांचे पती सुकांत ऊर्फ भाई सावंत (47, सडामिऱया व मिऱयाबंदर), रुपेश ऊर्फ छोटा भाई कमलाकर सावंत (43, मिऱयाबंदर) व कामगार प्रमोद बाबू गावणंग (33, कामगार) यांना अटक केली आहे. स्वप्नाली सावंत यांच्या आईने दिलेल्या तक्रारीवरुन, पोलिसांनी सुकांत सावंत, भाऊ रुपेश ऊर्फ छोटा भाई कमलाकर सावंत, प्रमोद बाबू गावणंग या तिघांविरोधात भादंविक 302, 201, 120 ब नुसार गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली आहे.
1 सप्टेंबर रोजी कट रचून या तिघांनी स्वप्नाली सावंतना जाळून मारल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात पती सुकांत ऊर्फ भाई सावंत यांनीच पोलिसात बेपत्ता असल्याची खबर दिली होती. त्यानंतर आपणच स्वप्नाली यांचा खून केल्याचे सुकांत यांनी चौकशीदरम्यान पोलिसांसमोर कबुल केले.
तपासासाठी सर्व शक्यतांची केली पडताळणी
या प्रकरणाचा तपास करत असताना हातात महत्त्वाचे धागेदोरे नसतानाही योग्य दिशेने तपासचक्रे पोलिसांनी सुरू ठेवली होती. पोलिसांनी 8 दिवस कसून या प्रकरणाची पाळेमुळे उकरून काढण्यासाठी तपासाच्या शक्यतांची पडताळणी सुरू ठेवली होती. गेले 3 दिवस रत्नागिरी शहरानजीकच्या मिऱया बंदर येथे जागेवर जाऊन पोलिसांनी तपास केला. प्रसंगी या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी श्वानपथकाचीही मदत घेण्यात आली होती.
जाळल्याच्या राखेचा पुरावाही नष्ट करण्याचा प्रयत्न
या तपासात धक्कादायक बाब म्हणजे स्वप्नाली सावंत यांना जाळून मारल्यानंतरही त्यांच्या मृतदेहाची राख कोणालाच कसला संशय व पुरावा मिळू नये यासाठी खबरदारी घेतली. त्यामुळे मृतदेह जाळल्यानंतर राख व हाडे नेमकी कुठे टाकली, हे अद्याप त्याने पोलिसांना सांगितलेले नाही. हत्येचा तोच एकमेव पुरावा सुकांत सावंतने गायब केला आहे. प्राप्त माहितीनुसार, मिऱया येथील भाई सावंत यांच्या घराजवळून पोलिसांनी राख आणली होती. ती तपासासाठी फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आली आहे. स्वप्नाली यांना जाळून मारल्याचा आरोप रत्नागिरी शहर पोलिसांनी या तिन्ही संशयित आरोपींवर ठेवला आहे.
ताब्यात घेतलेला संशयित देत होता गुंगारा
स्वप्नाली सुकांत सावंत या गेले 9 दिवस बेपत्ता आहेत. त्यामुळे पोलिसांनी घातपाताची शक्यता प्राथमिक तपासानंतर वर्तवली होती. यासंबंधी पोलिसांनी एका कामगाराला ताब्यात घेतले होते. मात्र ताब्यात घेतलेला कामगार उलटसुलट जबाब देत होता. यामुळे तो पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न करत होता.
मोबाईलचे कॉल डिटेल्सही तपासले
प्रकरणात गती यावी व प्रकरणाचा उलगडा व्हावा, यासाठी प्रसंगी पोलिसांकडून स्वप्नाली सावंत यांचे कॉल डिटेल्सही तपासण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र 2 सप्टेंबरपासून स्वप्नाली यांचा मोबाईल बंद झाल्याचे आढळले. इतकेच नव्हे तर यासाठी बेपत्ता होण्याआधी त्यांचे कोणाचे बोलणे झाले होते का अथवा त्या कुणाच्या संपर्कात होत्या, याचीही चौकशी करण्यात आली होती. शिवाय स्वप्नाली यांचे नातेवाईक, शेजारी आदींचा जबाब पोलिसांनी नोंदवला होता. एका विहिरीचाही पोलिसांनी शोध घेतला. अथक प्रयासानंतर या प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावला.
रत्नागिरी पोलिसांच्या कौशल्याचे सर्वत्र कौतुक
या प्रकरणात रत्नागिरी पोलिसांनी कौशल्याने व जलदगतीने सूत्रे हलवून केलेल्या तपासाचे सर्वत्र कौतुक होत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस विभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघामारे, रत्नागिरी शहर पोलीस निरीक्षक विनीत चौधरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज भोसले, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे प्रवीण स्वामी आदी पोलिसांच्या पथकाने या तपासात मेहनत घेतली.
ठार मारण्यामागच्या कारणाचा उलगडा नाही
स्वप्नाली यांना ठार मारण्यात आल्यावर पोलिसांनी शिक्कामोर्तब केले आहे. पण त्यामागचे नेमके कारण काय, याचा उलगडा अजून झालेला नाही. पतीबरोबर त्यांचे कौटुंबिक वाद झाले होते. त्याविषयी आपल्या जीविताला धोका असल्याचे स्वप्नाली यांनी यापूर्वी कुटुंबियांशी बोलून दाखवल्याची चर्चा आहे. पण कोणत्या कारणातून हा वाद विकोपाला गेला. त्यानंतर पती सुकांत यांची त्यांना ठार मारण्यापर्यंत मजल गेली, याचे कारण गुलदस्त्यात असल्याचे पोलिसांनी सांगितले. लवकरच हे कारण तपासातून समोर येईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.
स्वप्नाली ही सुकांत सावंत याची दुसरी पत्नी
शिवसेनेचे रत्नागिरी उपतालुकाप्रमुख असलेल्या सुकांत सावंत यांची स्वप्नाली ही दुसरी पत्नी होती. राजकीय क्षेत्रात सुकांत यांच्या वाटय़ाला अनेक पदे पक्षाने बहाल केली. पहिल्या पत्नीला जि. प. अध्यक्षपदी विराजमान केले. त्यानंतर दुसरी पत्नी असलेल्या स्वप्नाली सावंतनाही पंचायत समितीच्या सभापतीपदी विराजमान करण्यात आले होते. पण सुकांत यांच्या घरातील कलह वारंवार चव्हाटय़ावर येत होता. सुकांत व स्वप्नाली या दोघांमध्ये मोठय़ा प्रमाणात कौटुंबिक वाद विकोपाला जात होता. अनेकवेळा त्यांच्यात जोरदार राडा होऊन ती प्रकरणे पोलीस स्थानकातून न्यायप्रविष्ट झाली आहेत.
गणेशोत्सवासाठी घरी आली अन् सुकांतने डाव साधला
कौटुंबिक वादामुळे दुसरी पत्नी असलेली स्वप्नाली सावंत आपल्या मुलीसह भाटय़े येथे भाडय़ाने राहत होती. गणपती उत्सवासाठी 31 ऑगस्टला ती मिऱया येथील घरी आली होती. पण या पती-पत्नीमधील वाद कायम राहिला होता. त्यातूनच पुन्हा 1 सप्टेंबरला स्वप्नाली व सुकांत यांच्यात वाद झाला. सुकांतचा राग अनावर झाला व त्याने स्वप्नालीचा गळा करकचून दाबला. त्यातच ती गतप्राण झाल्याचे पोलिसांनी केलेल्या तपासात समोर आले.
मृतदेह नष्ट करण्यासाठी घेतली भाऊ, कामगाराची मदत
गतप्राण झालेल्या स्वप्नालीचा मृतदेह गायब करण्यासाठी सुकांतने शांत डोक्याने प्लॅन आखला. पत्नीचा मृतदेह गायब करण्याकामी त्याने आपला भाऊ रुपेश ऊर्फ छोटा भाई व कामगार प्रमोद बाबू यांची मदत घेतली. घरात गणेशोत्सव सुरु असतानाच सुकांत पत्नीचा मृतदेह गायब करण्याचा प्लॅन करत होता.
बंगल्याच्या मागील बाजूला मृतदेह जाळला
1 सप्टेंबरच्या सायकांळी सुकांतने राहत्या बंगल्याच्या मागील बाजूला स्वप्नालीचा मृतदेह जाळून टाकला. जाळल्याची जागा दिसू नये म्हणून तेथील जागा पूर्णतः स्वच्छ करुन लादीवर टीसीएल पावडर टाकण्यात आली. त्यानंतर राखेसह हाडे गायब केली. स्वप्नालीच्या हत्येचा कोणताच पुरावा सुकांत सावंतने घटनास्थळी ठेवला नसल्याचे पोलिसांच्या तपासादरम्यान समोर आले.
स्वतःच दिली बेपत्ताची खबर
या प्रकरणात पत्नीच्या हत्येचा संशय आपल्यावर येऊ नये, यासाठी सुकांतने 2 सप्टेंबर रोजी पत्नी स्वप्नाली सावंत बेपत्ता झाल्याची तक्रार शहर पोलीस स्थानकात दाखल केली होती. पती-पत्नीच्या वादामुळे पत्नी स्वप्नाली रागाच्या भरात बाहेर गेली असावी, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. तरीही पोलिसांनी सर्व दिशेने तपास सुरु ठेवला होता.
पती-पत्नीमधील पूर्वीच्या वादामुळे चौकशीसाठी ताब्यात
तपासाला गती देण्यासाठी व पती-पत्नीच्या पूर्वीची लाभलेली किनार लक्षात घेता पोलिसांनी पती सुकांत यांची चौकशी सुरू केली. पोलिसांचा संशय पती सुकांत सावंत यांच्या दिशेनेही वळला होता. सुकांतने चौकशीदरम्यान सुरुवातीला पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. पत्नी बेपत्ताच झाली आहे, मुलाने तिला रत्नागिरीला सोडले होते. तेथून ती कुठे गेली माहित नाही, अशी दिशाभूल करणारी उत्तरे दिली होती. मात्र त्यानंतर तपासाचा केंद्रबिंदू पतीच असल्याचा संशय बळावला होता. त्यामुळे चौकशीदरम्यान पत्नी स्वप्नालीची हत्या आपणच केल्याची कबुली सुकांतने दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
बंगल्याच्या बाजूला मृतदेह जाळल्याचीही दिली कबुली
पत्नी स्वप्नाली यांच्या हत्येची कबुली दिल्यानंतरही सुकांतने मृतदेह कुठे आहे हे सांगण्यास नकार दिल्याने पोलिसांसमोर तपासाच्या दिशेला प्रश्न उभा ठाकला होता. मृतदेह मिळाल्याशिवाय ग्न्हा दाखल करणार कसा, असा प्रश्न निर्माण झाला होता. याचदरम्यान पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी स्वतः घटनास्थळाची पहाणी केली होती. त्यानंतर तपासाला अधिक वेग आला. उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे, पोलीस निरीक्षक विनीत चौधरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज भोसले, प्रवीण स्वामी यांच्यासह अन्य अधिकारी, अमंलदार यांनी सुकांतची चौकशी केल्यानंतर त्याने स्वप्नालीची हत्या करुन बंगल्याच्या बाजूला तिचा मृतदेह जाळून नष्ट केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.