जमात उलेमा ए हिंदची भूमिका ः माफी मागितली असल्याने वादावर पडदा टाकावा
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
एकीकडे प्रेषितांसंबंधीच्या वादग्रस्त टिप्पणीवरून देशभरात गदारोळ सुरू असताना मुस्लीम संघटना जमात उलेमा-ए-हिंदने नुपूर शर्मा यांनी माफी मागितली असल्याने तिला आम्ही माफ करणे हेच योग्य ठरणार असल्याची भूमिका घेतली आहे.
माफ करण्यासाठी मोठे मन असायला हवे. कधीकधी इस्लामसंबंधी माहिती नसल्याने अनेकदा अनावश्यक विधाने केली जातात. असदुद्दीन ओवैसी आणि मोहम्मद मदनी यासारखे लोक सर्वसामान्यांना केवळ भडकविण्याचे काम करत असतात. तर आम्ही देशातील 20 कोटी लोकांचे नव्हे तर पूर्ण देशातील लोकांबद्दल बोलतो असे उद्गार जमात उलेमा ए हिंदचे मौलाना सुहेब कासमी यांनी काढले आहेत.
जमात उलेमा ए हिंद ही संस्था असदुद्दीन ओवैसी आणि मदनी यांच्यासह अनेकांच्या विरोधात लवकरच फतवा काढणार आहे. याकरता 100 हून अधिक देशभरातील मौलानांची स्वाक्षरी घेतली जात आहे. ओवैसी आणि मदनी हे इतरांना भडकविण्याचे काम करतात आणि याचा फटका हिंसा करताना पकडले जाणाऱया युवकांना बसतो. प्रत्यक्षात भाजपचे सरकार सत्तेवर आल्यापासून अशा लोकांची कमाई बंद झाल्यानेच ते समाजात दुही निर्माण करत आहेत. दंगल भडकविणारे आणि हिंसा फैलावणाऱयांच्या विरोधात बुलडोझरची कारवाईच योग्य असल्याचे मौलाना कासमी यांनी म्हटले आहे.
नुपूर शर्मा यांनी स्वतःच्या विधानाबद्दल माफी मागितली असून भाजपने त्यांना निलंबित केले आहे. अशा स्थितीत 15 दिवसांनी शुक्रवारी देशभरात हिंसक निदर्शने करण्याचा प्रकार मोठय़ा कटाकडे इशारा करतो. भारत हा घटनेने चालणारा देश आहे. आम्ही कुठल्याही प्रकारच्या हिंसेच्या बाजूने नाही असे कासमी यांनी म्हटले आहे.
हा आमचा देश आहे आणि आम्ही या देशावर प्रेम करतो. काही लोक हे प्रेम संपवू पाहत आहेत. जमात उलेमा ए हिंद देशाचा विकास इच्छिणाऱया मुस्लिमांसाब्sात उभी आहे. नुपूर शर्माच्या विधानावर काही लोकांकडून राजकारण होत असून आमचा याला विरोध असल्याचे ते म्हणाले.