पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर मोठा शाब्दिक हल्ला
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सलग दुसऱया दिवशी गुजरातमधील प्रचारसभेला संबोधित करताना काँग्रेसवर शाब्दिक प्रहार केला आहे. कांकरेजनंतर पाटण येथे पोहोचलेल्या पंतप्रधान मोदींनी काँग्रेसच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. काँग्रेस पक्षाने निवडणुकीतील पराभव मान्य केला आहे. काँग्रेस पक्ष पराभवानंतर ईव्हीएमवर त्याचे खापर फोडतो. काँगेसकडे केवळ दोनच कामे आहेत, यातील एक ईव्हीएममध्ये त्रुटी शोधत बसणे आणि दुसरे काम मोदीला शिव्या घालणे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान मोदींनी यापूर्वी गुरुवारीच्या प्रचारसभांमध्ये काँग्रेसला लक्ष्य केले होते. काँग्रेसच्या नेत्यांमध्ये मला शिव्या घालण्याची शर्यत सुरू आहे. काँग्रेस नेत्यांकडूला मला उद्देशून अनेक अपशब्द उच्चारण्यात आले आहेत. हा प्रकार गुजरातचा अपमान करणारा असल्याचे मोदींनी म्हटले होते.
गुजरातमध्ये पुन्हा एकदा भाजपचे सरकार स्थापन होणार आहे. यामागे लोकांचा भाजपवर असलेला विश्वास कारणीभूत आहे. पाटण येथेच माझे बालपण गेले आहे. पाटण ही उत्सवांची भूमी असल्याचे म्हणत मोदींनी लोकांना अधिक संख्येत मतदान करत कमळ फुलविण्याचे आवाहन केले आहे. तत्पूर्वी मोदींनी कांकरेज येथील जाहीरसभेला संबोधित केले तसेच औघडनाथ मंदिरात पोहोचत दर्शन घेतले आहे.
काँग्रेस पक्ष गरीबी हटविणार असे बोलत होता. परंतु प्रत्यक्षात गरीबी आम्ही हटविली आहे. काँग्रेसला या देशात शौचालयेही निर्माण करता आलेली नाहीत. आमच्या सरकारने गरीबांसाठी खाती उघडून दिली आहेत. आमचा पक्ष गरीबांची चिंता करतो, कोरोना काळात पूर्ण जग त्रस्त असतानाही आम्ही गरीबांना उपाशीपोटी राहू दिले नसल्याचे उद्गार मोदींनी काढले आहेत.
विकासकामांसाठी मतदान
बनासकांठा येथील सभेत बोलताना पंतप्रधानांनी उपस्थित समुदायाला उद्देशून मी येथे स्वतःसाठी मत मागण्याकरता आलेलो नाही, तर तुमच्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याची हमी देण्यासाठी आलो असल्याचे उद्गार काढले आहेत. मी जर तुमच्या कल्याण आणि विकासासाठी काम केल्याचे वाटत असेल तरच मत द्या असेही मोदींनी उपस्थित समुदायाला उद्देशून म्हटले आहे.
काँग्रेसवर बरसले
एकेकाळी दररोज वृत्तपत्रांमध्ये केवळ घोटाळय़ांच्या बातम्या छापून येत होत्या. हे घोटाळेही छोटे नव्हे तर अनेक लाखो कोटी रुपयांचे असायचे. केवळ वैयक्तिक लाभ होईल अशाप्रकारचे काम काँग्रेस करत असल्याने देशाचा विकास होत नव्हता. देशभरात अस्तित्वात नसलेल्या लोकांच्या नावाने 4 कोटी रेशनकार्ड्स जारी करण्यात आल्या होत्या. ही सर्व रेशनकार्ड्स आमच्या सरकारने रद्द केली आहेत. कायमस्वरुपी भ्रष्टाचार संपविण्यासाठी आता सर्व रेशनकार्ड्स ऑनलाइन पोर्टलला जोडण्यात आली आहेत. कुठल्या दुकानावर किती धान्य येते आणि कुणाला किती धान्य मिळतेय हे आता सर्वकाही समजत आहे. अशाप्रकारे काँग्रेसचा हा भ्रष्टाचार संपविल्याचा दावा मोदींनी केला आहे.
पुन्हा रोड शो
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शुक्रवारी एकूण 4 जाहीर सभा झाल्या आहेत. दिवसातील अखेरची जाहीर सभा अहमदाबाद येथील सरसपूर येथे पार पडली आहे. तसेच पंतप्रधान मोदींचा शुक्रवारही अहमदाबादमध्ये रोड शो झाला आहे. हा रोड शो शाहीबाग येथून सुरू झाला. रोड शो करत मोदी हे सरसपूर येथे पोहोचले आहेत. तर गुरवारी पंतप्रधान मोदींनी अहमदाबादमध्ये 49 किलोमीटर लांबीचा रोड शो केला होता. याद्वारे त्यांनी 13 विधानसभा मतदारसंघांना व्यापले होते.