इटगी येथील महिला मेळाव्यात आमदार अंजली निंबाळकर यांचे प्रतिपादन : खानापूरच्या विकासांसाठी कायम प्रयत्नशील
खानापूर : देशातील सर्वसामान्य घटकांचा विकास आणि सर्वोन्नती हेच काँग्रेसचे धोरण आहे. महिलांनाही पुरुषाबरोबर अधिकार देण्याचे काम काँग्रेसनेच केले आहे. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज यांच्या विचारावर काँग्रेस वाटचाल करत आहे. आज महिलांच्या उन्नतीसाठी जे जे काही करता येईल, ते काँग्रेसने केले आहे, असे प्रतिपादन इटगी येथील महिला मेळाव्यात बोलताना आमदार अंजली निंबाळकर यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष महादेव कोळी होते. खानापूर तालुक्याच्या विकासासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करत असून खानापूर तालुक्याचे नाव राजकीय पटलावर आणण्याचे काम केले आहे. तालुक्याची भौगोलिक व्याप्ती पाहता विकासाचा समतोल साधणे अशक्यप्राय होते. मात्र मी कोणताही भेदभाव न करता तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी जे काय करता येईल ते करत आहे. मात्र केंद्रातील व राज्यातील भाजप सरकार जाणीवपूर्वक तालुक्याच्या विकासकामात खिळ घालत आहे. त्यामुळे अनेक विकासकामे रखडलेली आहेत. मात्र ती भविष्यात निश्चित पूर्ण होतील, असा मला विश्वास वाटतो.
यावेळी पूर्व भागातील महिला मोठ्या संख्येने या मेळाव्याला उपस्थित होत्या. यानंतर हळदी-कुंकू कार्यक्रम पार पडला. आमदार अंजली निंबाळकर यांनी सर्व महिलांना प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या. यावेळी काँग्रेसचे विजय सानिकोप, महिला अध्यक्षा अनिता दंडगल, गीता अंबडकट्टी, सेलचे अध्यक्ष लक्ष्मण मादार, मल्लीकार्जुन तुरमुरी, बसवराजा पुंडे, इकबाल नदाफ, इटगी ग्रा. पं. अध्यक्षा शांतव्या सुनगार, उपाध्यक्ष रायाप्पा बळगप्पन्नावर यासह काँग्रेसचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.