पुणे / प्रतिनिधी :
पुढील चार ते पाच दिवस राज्यात थंडीची स्थिती ‘जैसे थे’च राहणार आहे. याबरोबरच कोकण तसेच मध्य महाराष्ट्रातील काही भागात पुढील तीन दिवस तुरळक पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. दरम्यान, शनिवारी पुण्यात सर्वांत कमी 13.4 अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदविण्यात आले आहे.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र सध्या उत्तर तामिळनाडू किनारपट्टी, पाँडेचरी व लगतच्या भागात आहे. तसेच याची तीव्रताही कमी झाली आहे. हे क्षेत्र पश्चिम उत्तर-पश्चिमेच्या दिशेने केरळकडे जात रविवारी अरबी समुद्रात सामावण्याची शक्यता आहे. याच्या प्रभावामुळे केरळ, तामिळनाडू, पाँडेचरीच्या भागात जोरदार पाऊस होत असून, या भागात जोरदार वारेही वाहत आहेत. या कमी दाबाच्या क्षेत्रामुळेच राज्यातील काही भागात थंडीचा जोर काहीसा कमी झाला आहे, तर काही भागात तुरळक पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. रविवारी कमी दाबाचे क्षेत्र अरबी समुद्रात सामावल्यानंतर थंडीचा जोर काहीसा वाढणार आहे. यात वायव्य भारतातील किमान तापमानात 2 ते 4 अंश सेल्सिअने घटेल, तर पूर्व भागात पुढील तीन दिवसांत हळूहळू थंडीचा जोर वाढणार असून, किमान तापमान 2 ते 3 अंश सेल्सिअसने घटणार आहे. भारतात इतरत्र पुढील चार ते पाच दिवस किमान तापमान कायम राहील. तर 13 नोव्हेंबरला हिमालयात पश्चिमी प्रक्षोभ निर्माण होणार असल्याने याच्या प्रभावामुळे हिमवर्षावाची शक्यता आहे.
अधिक वाचा : शरद पवारांनी कुठली सहकारी संस्था सुरू केली?; प्रल्हादसिंग पटेल यांचा सवाल
शनिवारी सकाळी राज्यातील विविध शहरांत नोंदविण्यात आलेले किमान तापमान अंश सेल्सिअसमध्ये पुढीलप्रमाणे : कुलाबा 24.6, सांताक्रूझ 22.2, रत्नागिरी 20.7, डहाणू 20.3, नगर 15.4, जळगाव 16.4, कोल्हापूर 18, महाबळेश्वर 13.9, नाशिक 13.9, सांगली 17.8, सातारा 16.8, सोलापूर 16.4, उस्मानाबाद 17, औरंगाबाद 14.2, परभणी 16.5, नांदेड 17.4, अकोला 18, अमरवती 17.3, ब्रह्मपुरी 17.1, गोंदिया 17, नागपूर 17.1, वाशिम 17.2, वर्धा 18.2, पणजी 21.6.