मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन
प्रतिनिधी/ पणजी
शिक्षण क्षेत्रात डिजिटल क्रांती घडविण्यासाठी सरकार प्रयत्नरत असले तरी याकामी शिक्षकांबरोबरच पालकांचेही सहकार्य अपेक्षित आहे. त्यामुळे प्रत्येकाने डिजिटल क्षेत्रात क्रांती घडविण्याचे उद्दिष्ट समोर ठेवावे. गोवा मुक्तिलढय़ाचा इतिहास पाठय़क्रमात आणणार. तसेच शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडविणार, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
क्रांतिदिनाच्या प्रमुख सोहळ्यात पणजीत आझाद मैदावर झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राज्यपाल पी. श्रीधरन पिल्लई, सभापती रमेश तवडकर, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, मंत्री सुभाष फळदेसाई, आमदार रुडॉल्फ फर्नांडिस यांच्यासह स्वातंत्र्यसैनिक संघटनांचे पदाधिकारी, प्रशासकीय अधिकारी आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. पोर्तुगीज राजवटीतून गोवा मुक्त करण्यासाठी स्वातंत्र्यसैनिकांनी दिलेल्या बलिदानाचे मुख्यमंत्र्यांनी स्मरण केले. राज्यपालांच्या हस्ते हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.
रोबोटिक व कोडिंग शिक्षणपद्धतीला प्रारंभ
मुक्तीनंतर गोवा खऱया अर्थाने विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे. विद्यमान युग हे डिजिटल क्रांतीचे असून रोबोटिक व कोडिंग शिक्षण पद्धतीला प्रारंभ झाला आहे. यावरून शिक्षण क्षेत्राची वाटचाल डिजिटल क्रांतीच्याच दिशेने होत असल्याचा पुरावा आहे. शिक्षण क्षेत्रात आदर्श बदल घडविण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलली आहेत, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले.
स्मारकांना प्रत्येकांनी भेटी द्या
शेकडो गोमंतकीयांनी प्राणांची बाजी लावून स्वातंत्र्यसंग्रामात उडी घेतली. पकडल्या गेलेल्या स्वातंत्र्यसैनिकांनी नंतर तुरुंगात प्रखर यातना सोसल्या. आग्वाद कारागृह, आझाद मैदान, क्रांती मैदान, लोहिया मैदान, पत्रादेवी येथील हुतात्मा स्मारक हे त्यांच्या त्यागाचे साक्षीदार आहेत. त्या स्मारकांना प्रत्येकाने भेट देऊन पाहणी केली पाहिजे. आग्वाद कारागृहाला तर प्रत्येक गोमंतकीयाने एकदातरी भेट द्यावीच. त्याशिवाय गोवा मुक्तीचा इतिहास तरुण पिढीला समजावा यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आग्वाद कारागृह दाखवावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. या कारागृह संकुलाचे संग्रहालयात रूपांतर केले असल्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले.
अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांची यादी बनविण्याची प्रक्रिया
1955 मध्ये झालेल्या कार्यक्रमात सहभागी झालेले अनेक सत्याग्रही आजही आहेत ज्यांनी कधीच ‘स्वातंत्र्यसैनिक’ म्हणून नाव नोंदवले नाही. अशा अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांची यादी बनविण्याची प्रक्रिया गृह विभागातर्फे सुरू करण्यात आली आहे. तसेच राष्ट्रीय स्वातंत्र्यसैनिकांच्या यादीतही त्यांचा समावेश करण्यासाठी गोवा सरकार प्रयत्नरत असून त्यासंदर्भात केंद्र सरकारला पत्र लिहिणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
गोवा मुक्तीचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवा ः राज्यपाल
राज्यपाल श्री. पिल्लई यांनी आपल्या भाषणातून नवा गोवा निर्माण करायचा असेल तर येथील प्रत्येक नागरिक सुखी आणि आनंदी असेल याकडे लक्ष दिले पाहिजे, असे सांगितले. त्याचबरोबर गोवा मुक्तीचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचविला पाहिजे. एखाद्यावर अन्याय होत असेल तर त्याविरुद्ध आवाज उठविण्याचा अधिकार प्रत्येकाला असून त्याने निश्चितच आवाज उठवावा. नकारात्मक दृष्टिकोन नेहमीच धोकादायक असतो, असेही राज्यपाल म्हणाले. डॉ. राममनोहर लोहिया यांच्या प्रेरणेतून गोवा मुक्तीचा लढा सोपा बनला. त्यात देशभरातील स्वातंत्र्यसैनिकांनीही अमूल्य असे योगदान दिले, असे राज्यपालांनी सांगितले.
व्यासपीठावरील अन्य मान्यवरांनीही विचार मांडले. गोवा पोलीस दलाच्यावतीने हुतात्म्यांना मानवंदना देण्यात आली.