दोघांची 149 धावांची भागीदारी, भारत 6 बाद 278, तैजुल इस्लामचे 3 बळी
वृत्तसंस्था/ चत्तोग्राम
चेतेश्वर पुजारी आणि श्रेयस अय्यर यांच्या शानदार अर्धशतकांच्या जोरावर तसेच शतकी भागीदारीमुळे बुधवारपासून येथे सुरू झालेल्या यजमान बांगलादेश विरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारताने पहिल्या डावात दिवसअखेर 6 बाद 278 धावा जमविल्या. पुजाराचे शतक 10 धावांनी हुकले तर अय्यर 82 धावांवर खेळत आहे. बांगलादेशच्या तैजुल इस्लामने 3 तर मेहदी हसन मिराजने 2 गडी बाद केले.
या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार राहुल आणि गिल या सलामीच्या जोडीने 13.2 षटकात 41 धावांची भागीदारी केली. इबादत हुसेन, खलिद अहमद यांची वेगवान गोलंदाजी परिणामकारक होत असल्याने अनुभवी राहुल आणि गिल यांना फटकेबाजी करता आली नाही. खेळपट्टी पहिल्या तासातच फिरकीला अनुकूल ठरेल, या अंदाजाने बांगलादेशच्या कर्णधाराने 6 व्या षटकातच चेंडू फिरकी गोलंदाजाकडे सोपविला. शकीब अल हसनचे चेंडू चांगलेच वळत होते. पहिल्या 7 षटकात भारताने 30 धावा जमविल्या. मात्र, भारताच्या सलामीच्या जोडीला अधिक चौकार मारता आले नाहीत. बांगलादेशचे गोलंदाज यष्टीवर अचूकपणे गोलंदाजी करत होते. ताजुल इस्लामच्या चेंडूवर स्वीपचा फटका मारण्याच्या नादात गिल यासीर अलीकरवी झेलबाद झाला. त्याने 40 चेंडूत 3 चौकारांसह 20 धावा जमविल्या. भारताचा हा पहिला फलंदाज 41 धावांवर बाद झाला. खलिद अहमदच्या गोलंदाजीवर चुकीचा फटका मारण्याच्या नादात कर्णधार राहुल त्रिफळाचीत झाला. त्याने 54 चेंडूत 3 चौकारांसह 22 धावा जमविल्या. ताजुल इस्लामने भारताला आणखी एक जबरदस्त धक्का दिला. डावातील 20 व्या षटकात तैजुल इस्लामचा चेंडू अपेक्षेपेक्षा अधिक वळला आणि कोहलीला तो तटवता आला नाही. कोहली केवळ 1 धावेवर पायचीत झाला. भारताची स्थिती यावेळी 3 बाद 48 अशी केविलवाणी होती. भारताच्या सलामीच्या तीन फलंदाजांनी फटके मारताना फुटवर्कचा वापर न केल्याने ते लवकर बाद झाले.
अनुभवी चेतेश्वर पुजारा आणि रिषभ पंत या जोडीने एकेरी आणि दुहेरी धावांवर भर देत धावफलक हलता ठेवला. यष्टीरक्षक पंतने तैजुल इस्लामच्या एका षटकात सलग 2 चौकार आणि त्यानंतर लाँगऑनच्या दिशेने 1 षटकारही खेचला. पंतने आक्रमक फलंदाजीवर अधिक भर दिल्याने तैजुल इस्लाम आणि शकीब अल हसन यांच्या गोलंदाजीवर दडपण आल्याचे जाणवले. पंतने मेहदी हसन मिराजच्या चेंडूवर स्क्वेअरकटचा चौकार ठोकला. त्यानंतर त्याने तैजुल इस्लामला पुन्हा 2 चौकार मारले. उपाहारापूर्वीचे हे शेवटचे षटक होते. पुजारा आणि पंत यांनी चौथ्या गडय़ासाठी 64 धावांची भागीदारी केली.
उपाहारानंतरच्या खेळाच्या दुसऱया सत्रामध्ये पुजाराला जीवदान मिळाले. इबादत हुसेनच्या गोलंदाजीवर नुरुल हसनला पुजाराचा झेल टिपता आला नाही. पंतने मिराज आणि हुसेन यांच्या गोलंदाजीवर आणखी 2 चौकार मारले. डावातील 32 व्या षटकात रिषभ पंत चुकीचा फटका मारण्याच्या नादात मेहदी हसन मिराजच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. त्याने 45 चेंडूत 2 षटकार आणि 6 चौकारांसह 46 धावा झळकविल्या.
पुजारा आणि श्रेयस अय्यर या जोडीने संघाला सुस्थितीत नेताना 5 व्या गडय़ासाठी जवळपास 52 षटकात 149 धावांची भागीदारी केली. पुजाराने अर्धशतक पूर्ण केल्यानंतर तो अधिक आत्मविश्वासाने फटकेबाजी करू लागला. चहापानानंतरच्या शेवटच्या सत्रामध्ये पुजारा बाद झाला. 90 च्या घरात पोहोचल्यानंतर तो तैजुल इस्लामच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. त्याने 203 चेंडूत 11 चौकारांसह 90 धावा झळकविल्या. अय्यरला साथ देण्यासाठी अक्षर पटेल मैदानात आला. पटेलने 26 चेंडूत 2 चौकारांसह 14 धावा जमविल्या. पहिल्या दिवसाचा खेळ संपण्यापूर्वीच्या शेवटच्या चेंडूवर मेहदी हसनने त्याला पायचीत केले. पटेलने 2 चौकारांसह 14 धावा जमविल्या. श्रेयस अय्यर 169 चेंडूत 10 चौकारांसह 82 धावांवर खेळत आहे. अय्यर खूपच नशीबवान म्हणावा लागेल. इबादत हुसेनच्या षटकातील एका चेंडूवर अय्यर त्रिफळाचीत होत असताना थोडक्मयात बचावला. इबादत हुसेनचा हा चेंडू यष्टीला चाटून गेला, तसेच बेल्सही हलले, पण ते खाली न पडल्याने तो बाद होताना बचावला. बांगलादेशतर्फे तैजुल इस्लामने 84 धावात 3, मेहदी हसन मिराजने 71 धावात 2 तर खलिद अहमदने 26 धावात 1 गडी बाद केला. भारताच्या डावामध्ये आता रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, उमेश यादव आणि मोहमद शिराज हे उर्वरित फलंदाज असून त्यांच्याकडून अय्यरला साथ मिळाल्यास भारताला या सामन्यात 350 धावांपर्यंत मजल मारता येईल.
संक्षिप्त धावफलक
भारत प. डाव 90 षटकात 6 बाद 278 (के. एल. राहुल 22, गिल 20, पुजारा 90, कोहली 1, पंत 46, अय्यर खेळत आहे 82, अक्षर पटेल 14, तैजुल इस्लाम 3-84, मेहदी हसन मिराज 2-71, खलिद अहमद 1-26).