पथदीप बसविण्याकडे किणये ग्राम पंचायतीचे दुर्लक्ष : रात्री ग्रामस्थांना घरातून बाहेर पडणे होतेय अवघड
वार्ताहर /किणये
बेळगाव शहरापासून केवळ 17 किलोमीटर अंतरावर असलेले जानेवाडी गाव सध्या कित्येक दिवसांपासून अंधारातच आहे. किणये ग्राम पंचायतीकडून पथदीप बसविण्यात येत नसल्याच्या तक्रारी नागरिकांतून होत आहेत. वारंवार पंचायतीला सांगूनही दुर्लक्ष केले जात असल्याने ग्रामस्थांना अंधाराचा सामना करावा लागत आहे.
गेल्या महिनाभरापासून गावातील मुख्य ठिकाणी असलेले पाच पथदीप बंद आहेत. यामुळे काही ठिकाणी थोडाबहुत उजेड दिसतो. तर गावचा निम्म्याहून अधिक भाग अंधारातच आहे. यामुळे रात्रीच्या वेळी गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे.
अंधारामुळे लहान बालके व महिलांना घरातून बाहेर पडणे मुश्कील बनले आहे. तसेच रात्रीच्यावेळी गावात अंधार असल्याने बाहेरगावाहून येणाऱया पै-पाहुण्यांची गैरसोय होऊ लागली आहे.
जानेवाडी गावचा सदस्य नसल्याने पंचाईत
जानेवाडी गावचा किणये ग्राम पंचायतीमध्ये समावेश आहे. जानेवाडी गावात एकही सदस्य ग्राम पंचायतीच्या निवडणुकीत निवडून आलेला नाही. याचा फटकाही गावकऱयांना बसू लागला आहे.गावातील हक्काचा सदस्य असल्यास त्यांना आम्ही रोज आमच्या तक्रारी सांगू शकतो, असेही काही जणांनी सांगितले.
गावच्या मुख्य रस्त्यावरील तसेच समाजभवन व वडाच्या झाडाजवळील या मुख्य ठिकाणचे पथदीप बंद अवस्थेत आहेत. यामुळे गाव अंधारात असल्यासारखे दिसून येते.
किणये ग्राम पंचायतीच्या अध्यक्ष व पीडीओ यांनी जानेवाडी गावची पाहणी करावी व गावात मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तसेच बंद अवस्थेत असलेले पथदीप लवकरात लवकर सुरू करण्यात यावेत, अशी मागणी जानेवाडी ग्रामस्थांतून करण्यात येत आहे.
पथदिपांकडे दुर्लक्ष; मग विकासकामांकडे लक्ष कसे देणार
एक महिन्यापासून पथदीप बंद आहेत. किणये ग्राम पंचायतीकडून आमच्या गावाकडेच का दुर्लक्ष करण्यात येते? जानेवाडी गावच्या समस्या सोडविण्यासाठी कोणीही विशेष प्रयत्न करीत नाहीत. मग आम्ही दाद मागायची कुणाकडे? ग्राम पंचायतीसाठी पथदीप बसविणे हे कामकाज अगदीच सोपे आहे. मात्र, याकडेच कानाडोळा केला जात आहे. मग इतर विकासकामांबद्दल गावचा विचार काय होणार? ग्राम पंचायतीने त्वरित पथदीप बसविण्याची व्यवस्था करावी.
– नागेश पावशे