ऑनलाईन टीम / तरुण भारत :
‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ या गीताचा महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून स्वीकार करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून येत्या 19 फेब्रुवारीपासून हे गीत अंगिकारण्यात येईल, असा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त प्रत्येक राज्याला एक ठराविक गीत असावे, असे केंद्र सरकारने सुचवले आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील तीन गीतांची निवड झाली होती. त्यापैकी ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या गीताची राज्यगीत म्हणून निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे गौरव गीत म्हणून या गीताचा ओळख आहे. सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यापूर्वीच ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ या गीताला राज्यगीताचा दर्जा दिला जाईल, अशी घोषणा केली होती. अखेर त्याबाबत मंत्रिमंडळात निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता सर्व मोठय़ा शासकीय कार्यक्रमांमध्ये हे गीत लावले जाणार आहे. हे गीत संगीतकार श्रीनिवास खळे यांनी स्वरबद्ध केले असून, शाहिर साबळे यांनी आपल्या खणखणीत आवाजाने ते अजरामर केले आहे.
अधिक वाचा : MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश; नवीन नियम 2025 पासून लागू होणार