मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा राजीनामा ः विधान परिषद सदस्यत्वाचाही राजीनामा
प्रतिनिधी/ मुंबई
गेल्या 10 दिवसांच्या सत्ता संघर्षनाटय़ाचा अंक या निर्णयामुळे संपुष्टात आला आहे. शिवसेनेतील बडे नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे गटाने 39 आमदारांसह बंड पुकारल्याने ठाकरे सरकार अल्पमतात आले. त्यानंतर भाजपने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पत्र देत मविआ सरकारने बहुमत सिद्ध करावे, अशी मागणी केली. राज्यपालांनी तसे आदेशही मविआ सरकारला दिले. तथापि त्याविरोधात शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय ठाकरे सरकारच्या विरोधात गेला आणि अखेर उद्धव ठाकरेंवर राजीनामा देण्याची वेळ आली. या निर्णयानंतर हे सत्तासंघर्ष नाटय़ अखेर संपुष्टात आले आहे.
आमचेच लोक आमच्यावर नाराज
जनतेशी संवाद साधताना ठाकरे म्हणाले, ज्यांना मोठे केले असे लोक सत्ता आल्यावर आमच्यावरच नाराज होत आहेत. ज्यांना सगळे दिले ते नाराज झाले, मात्र ज्यांना काही दिले नाही ते सगळे आजही सोबत आहेत. ही शिवसेनेची ताकद आहे. आणि त्यामुळे न्यायदेवतेचा निकाल आपण मान्य केला आहे. काँग्रेसवाले बाहेरून पाठिंबा द्यायला तयार आहेत. मात्र मी त्यांना तसे सांगितले नाही, असेही ठाकरेंनी स्पष्ट केले. औरंगाबादचे नामांतर करूनही मी हिंदुत्व सोडले असे त्यांना वाटत असेल तर आम्ही काय करावे, तुम्ही सगळे माझ्यासमोर येऊन बोलायला हवे होते. आम्ही तुम्हाला आपले मानले होते, असेही ते
म्हणाले.
पदाची लालसा नाही
ठाकरे म्हणाले, माझ्या विरोधात कोण आहे, किती आहेत यात मला अजिबात रस नाही. मला खेळ खेळायचे नाहीत. ज्यांना शिवसेनेने जन्म दिला, शिवसेनाप्रमुखांनी मोठे केले त्या शिवसेना प्रमुखांच्या पुत्राला मुख्यमंत्रिपदावरून खाली उतरवण्याचे पुण्य त्यांनाच लाभू द्या. त्यांचे हे पुण्य मला हिरावून घ्यायचे नाही. मला मुख्यमंत्रिपदाची इच्छा अजिबात नाहीये. कारण मला पदाची लालसा नव्हती आणि नाहीही, असेही त्यांनी स्पष्ट केले. बहुमताचा खेळ मला खेळायचा नाही. तुम्हाला मोठे केले हे माझे पाप आहे. माझ्या पापाची फळ मला भोगावी लागत आहेत, असा बंडखोरांना इशारा दिला.
चांगल्या गोष्टीला दृष्ट लागते
एखादी गोष्ट चांगली सुरू असेल तर त्याला दृष्ट लागते. आपल्या सरकारला कोणाची नजर लागली हे सर्वांना माहित आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी यांचे खास आभार. जनतेच्या आशीर्वादाने चांगले काम करु शकलो. मी आपल्याशी आज मनापासून बोलतोय आणि नेहमीच मनापासूनच बोलत आलोय.बाळासाहेबांनी ज्यांना मोठे केले ते विसरले, ज्यांना सत्ता आल्यावर जे जे शक्य होते ते दिले. ते लोक नाराज झाले. साधी साधी माणसं ज्यांना काही दिलं नाही ते हिंमतीने सोबत आहेत. याला म्हणतात माणुसकी, याला म्हणतात शिवसैनिक. याच नात्याच्या जोरावर
शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न पूर्ण केले
मी मुख्यमंत्री पदाची सुरुवात केली ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्म स्थळाला निधी देत. माझे आयुष्य सार्थकी लागले आहे. कारण शिवसेनाप्रमुखांनी सांगितल्याप्रमाणे औरंगाबादचे नाव संभाजीनगर केले आहे. उस्मानाबादचे नाव धाराशीव केले आहे. मी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सहकाऱयांचे आभार मानतो. राष्ट्रवादी व काँग्रेसकडून या ठरावाला विरोध झाला नाही. शरद पवार, सोनिया गांधी यांनी मोठे सहकार्य केले, असे सांगत त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीचे आभार मानले.
न्यायालयाचा निर्णय मान्य करतो
मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, अनेक आव्हाने आली, आपण ती पारही केली. न्यायदेवतेचा आज निकाल आला. तो मान्य करायलाच हवा. त्यांनीसुद्धा तातडीने फ्लोअर टेस्ट करण्याच्या राज्यपालांच्या आदेशाचे पालन करण्यास सांगितले. राज्यपालांनी लोकशाहीचा मान राखला. तातडीने चोवीस तासाच्या आत फ्लोअर टेस्ट करायला लावली. पण दीड-पावणेदोन वर्षे बारा आमदारांची यादी लटकवून ठेवली तेव्हा लोकशाही नव्हती, असा टोलाही त्यांनी राज्यपालांना मारला.