पीसीबीची एसीसीकडे बैठक घेण्याची मागणी
वृत्तसंस्था /लाहोर
पुढील वर्षी पाकिस्तानात होणाऱया आशिया चषक स्पर्धेत खेळण्यासाठी भारतीय संघ पाकिस्तानात जाणार नाही, असे स्पष्ट विधान भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शहा यांनी केल्याने पाकिस्तानने नाराजी व्यक्त केली आहे. एशियन क्रिकेट मंडळाने यासंबंधी त्वरित बैठक आयोजित करावी आणि भूमिका स्पष्ट करावी, असे आवाहन पाक क्रिकेट मंडळाने केले.
आशिया चषक स्पर्धा त्रयस्थ स्थळी व्हावी. ती पाकमध्येच होणार असेल तर भारतीय संघ त्या देशात जाणार नाही, अशी घोषणा जय शहा यांनी मंगळवारी केली होती. त्यावर पाकिस्तान क्रिकेट मंडळाने आपली पहिली अधिकृत प्रतिक्रिया देताना नाराजी व्यक्त केली. अशा प्रकारच्या कृत्याने आशियाई क्रिकेटमध्ये फूट पडेल असा कांगावाही करण्यात आला. 2023 मध्ये विश्वचषक स्पर्धा भारतात होणार आहे. त्या स्पर्धेत भाग घ्यायचा की नाही हे पाकिस्तानला ठरवावे लागेल, असा गर्भित इशाराही पाक क्रिकेट मंडळाने दिला आहे.
शहा हे एसीसीचे अध्यक्ष
जयेश शहा हेच एशियन क्रिकेट मंडळाचे (एसीसी) पदसिद्ध अध्यक्ष आहेत. त्यामुळे ते पाकिस्तानची मागणी मान्य करणार का, असा प्रश्न आहे. नियमाप्रमाणे एकाच सदस्य देशाने मागणी केल्यास ती मान्य करण्याची आवश्यकता एसीसी अध्यक्षांना नसते. मात्र, पाकिस्तान आपल्या मागणीवर ठाम आहे. जयेश शहा यांच्या विधानामुळे क्रिकेटच्या वातावरणावर विपरीत परिणाम होऊ शकतो. आतापर्यंत शहा यांच्या विधानावर एसीसीने आपली भूमिका पाकिस्तानला कळविलेली नाही. त्यामुळे आम्ही एसीसीला तातडीची बैठक आयोजित करण्याचे आवाहन करीत आहोत. या बैठकीत अध्यक्षांच्या विधानांवर सांगोपांग चर्चा होईल आणि एसीसी भूमिका स्पष्ट करेल अशी आमची अपेक्षा आहे. हा संवेदनशील विषय आहे हे सर्व संबंधितांनी ध्यानी घ्यावे, असेही पाकने सुचविले आहे.
यजमानपद पाकिस्तानकडे
2023 आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे असून 2023 मध्ये होणाऱया विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद भारताकडे आहे. गेल्या महिन्यात टी-20 स्पर्धेचे ठिकाण श्रीलंकेकडून संयुक्त अरब अमिरातीत हलविण्यात आले होते. श्रीलंकेची दयनीय आर्थिक स्थिती हे त्याचे कारण होते.