वॉशिंग्टन / वृत्तसंस्था
अमेरिकेतल्या मुख्य प्रवाहातील मीडिया भारताच्या संबंधी पक्षपाती वृत्तांचे प्रसारण करतात, अशी टीका भारताचे विदेश व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी केली आहे. त्यांनी नाव न घेता तेथील काही वृत्तपत्रांवर शरसंधान केले. ते येथे सोमवारी भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिकांच्या कार्यक्रमात बोलत होते.
भारत सध्या एका वैश्विक शक्तीच्या रुपात समोर येत आहे. याचा अशा वृत्तपत्रांना हेवा वाटतो. ही वृत्तपत्रे अद्याप जुन्याच मानसिकतेत आहेत. भारतासंबंधी ही वृत्तपत्रे कशा प्रकारची वृत्ते प्रसिद्ध करणार आहेत, याचे अनुमान आधीच प्रत्येकाला काढता येते. कारण त्यांचा भारतासंबंधीचा आशय ठरलेला असतो. तो पूर्वनिर्धारित असतो आणि त्याची धाटणीही ठरलेली असते. भारतात घडणाऱया परिवर्तनाचा आणि भारताच्या जगात वाढत असलेल्या महत्वाचा मागोवा ही वृत्तपत्रे कधीही घेत नाहीत. त्यांना भारत एका विशिष्ट चौकटीतच रंगवायचा असतो, अशी खरमरीत टीका करतानाच त्यांनी नाव न घेता वॉशिंग्नट पोस्टचा उल्लेख केला. सध्या या वृत्तपत्राची मालकी अमेझॉनच्या जेफ बेझोस यांच्याकडे आहे.
भारत सरकारने घटनेचा 370 वा अनुच्छेद निष्प्रभ करण्याचा निर्णय घेतला. हा अनुच्छेद ही केवळ एक अस्थायी व्यवस्था होती. ती काढून टाकल्याने कोणालाही दुःख होण्याचे कारण नव्हते. भारतात या निर्णयाचे स्वागत झाले आहे. मात्र अमेरिकेतील काही वृत्तपत्रांनी याचे वर्णन बहुसंख्याकवादी निर्णय असे केले आहे. हा पूर्णतः पक्षपात असून भारताच्या अंतर्गत अधिकारात ढवळाढवळ आहे. काश्मीरमध्ये जो हिंसाचार होत होता तो तेथील बहुसंख्याकवादच नव्हता काय? पण त्यासंबंधी ही वृत्तपत्रे मूग गिळून गप्प बसतात असा टोला त्यांनी लगावला.
हिताचे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य
एनआरसी, सीएए आदी मुद्दय़ांवर घेतलेले निर्णय हे भारताच्या हिताचे आहेत. भारताला आपल्या हिताचा विचार करुन निर्णय घेण्याचा अधिकारच आहे. भारताबाहेरच्या वृत्तपत्रांनी त्यात विचार स्वातंत्र्याच्या नावाखाली हस्तक्षेप करण्याचे कारण नाही. भारत टप्प्याटप्प्याने आत्मनिर्भर होत असून स्वतःच्या हिताचे निर्णय घेण्यासही तो मागेपुढे पाहणार नाही. भारत आता पूर्वीप्रमाणे परावलंबी मानसिकतेचा राहिलेला नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.