प्रतिनिधी /खानापूर
जांबोटी ग्राम पंचातीचे विकास अधिकारी नागाप्पा बन्नी यांची बदली करण्यात यावी, या मागणीसाठी जांबोटी ग्रा. पं. सदस्यांनी तालुका पंचायत कार्यालयासमोर सोमवारी ठिय्या आंदोलन केले. जोपर्यंत बदली होणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवू, मंगळवारी ग्रा.पं.ला टाळे ठोकून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा जांबोटी पंचायतीचे महेश गुरव यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना दिला.
जांबोटी ग्रा.पं.ला तीन वर्षात विकास अधिकारी मिळाला नसल्याने या पंचायतीची विकासकामे ठप्प झाली आहेत. यापूर्वी आलेले विकास अधिकारी उदयकुमार शिवपुरी अवघ्या तीन महिन्यात निवृत्त झाले. त्यानंतर आलेल्या विकास अधिकारी श्रीदेवी अंगडी या प्रकृती अस्वास्थ्यामुळे कायम गैरहजर राहत होत्या. त्यांनी आपल्या प्रकृतीचे कारण देऊन बदली करून घेतली. त्यानंतर नागाप्पा बन्नी यांची जांबोटी ग्रा. पं. विकास अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली. मात्र, त्यांचा आजपर्यंत कारभार पाहता त्यांना जांबोटी ग्रा.पं.तील विकासकामे राबवण्यात निश्चित अडथळा होणार, यासाठी त्यांची बदली करावी, अशी मागणी गेल्या महिन्यापासून करण्यात येत आहे.
मात्र निवडणुकीच्या आचारसंहितेचे कारण देऊन त्यांना जांबोटीत कायम करण्यात आले. आता आचारसंहिता संपली असून त्यांची जांबोटी येथून त्वरित बदली करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. या ठिय्या आंदोलनात ग्रा. पं. अध्यक्ष महेश गुरव, उपाध्यक्षा मयूरी सुतार, सदस्य सुनील देसाई, मंजुनाथ मुतगी, सूर्यकांत साबळे, अशोक सुतार, अंजना हणबर, अनुराधा सडेकर, लक्ष्मी तळवार, प्रविणा साबळे, लक्ष्मी मादार आदी सहभागी झाले होते.