काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे वक्तव्य : इंडिया-काँग्रेसने मोदींचा अतिआत्मविश्वास मोडीत काढला
वृत्तसंस्था /श्रीनगर
जम्मू-काश्मीरचे प्रतिनिधित्व करणे आणि राज्याचा दर्जा परत मिळवून देणे सर्वात आवश्यक आहे. जम्मू-काश्मीरशी माझे रक्ताचे नाते आहे. अशास्थितीत निवडणुकीत लोक आम्हाला अवश्य साथ देतील अशी अपेक्षा असल्याचे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी श्रीनगरमध्ये पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हटले आहे. जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली असल्याने आता सर्वच पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. लोकसभा निवडणुकीत आम्ही पंतप्रधान मोदींचा अतिआत्मविश्वास मोडीत काढला आहे.
आता त्यांची छाती 56 इंचाची राहिलेली नाही. काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांचा सन्मान झाला तरच जम्मू-काश्मीर निवडणुकीत आघाडी केली जाईल असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे दोन दिवसीय दौऱ्यानिमित्त बुधवारी श्रीनगर येथे पोहोचले हेते. गुरुवारी त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतल्या आहेत.
देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या राज्याचा दर्जा काढून घेत त्याला केंद्रशासित प्रदेश करण्यात आले आहे. याचमुळे राज्याचा जुना दर्जा परत मिळणे आमच्यासाठी आवश्यक आहे. याचमुळे आम्ही सर्व मिळून येथे आलो आहोत. मी पूर्ण देशात लोकशाहीचे रक्षण करतो, परंतु माझे लक्ष्य देशाच्या लोकांच्या मनात असलेली भीती दूर करणे आहे. लोकांना जे सहन करावे लागते ते काँग्रेस संपवू पाहत असल्याचे उद्गार राहुल गांधी यांनी काढले आहेत. लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीने मोदी आणि त्यांच्या पक्षाला धक्का दिला आहे.
मोदींना मी नव्हे तर प्रेम आणि एकतेने पराभूत केले आहेत. मोदींचा स्वत:वरील विश्वास आम्ही मोडला आहे. आम्हाला द्वेषाच्या बाजारात प्रेमाचे दुकान सुरू करायचे आहे. द्वेषाने द्वेष संपविला जाऊ शकत नाही. प्रेमाने द्वेष संपविता येतो. आम्ही द्वेषभावनेवर प्रेमाने मात करू असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. राहुल आणि खर्गे हे बुधवारी श्रीनगरमधील प्रसिद्ध अहदूस रेस्टॉरंटमध्ये डिनर करण्यासाठी पोहोचले होते. हे रेस्टॉरंट काश्मिरी खान-पानासाठी प्रसिद्ध आहे. तसेच रेस्टॉरंटमधून झेलम नदीचे दृश्य दिसते. यावेळी रेस्टॉरंट परिसरात मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. डिनरनंतर राहुल गांधी हे लाल चौकातील एका आईस्क्रीम पार्लरच्या ठिकाणी पोहोचले हेते.
काश्मीरमध्ये 12 जागांची मागणी
नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस यांच्यात बुधवारी जागावाटपावरून चर्चा झाली. काँग्रेसकडून नॅशनल कॉन्फरन्ससोबत आघाडी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. याचमुळे गुरुवारी फारुख अब्दुल्ला आणि ओमर अब्दुल्ला यांच्याशी देखील चर्चा झाल्याचे समजते. तत्पूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तारिक हामिद कर्रा यांनी नॅशनल कॉन्फरन्सचे महासचिव अली मोहम्मद सागर यांच्यासोबत बैठक घेतली. यादरम्यान काँग्रेसने काश्मीरमधील 12 जागांची मागणी केली आहे. तसेच जम्मूमध्ये देखील तितक्याच जागा नॅशनल कॉन्फरन्ससाठी सोडण्याचा प्रस्ताव दिला आहे. नॅशनल कॉन्फरन्सचे नेते काश्मीर खोऱ्यात काँग्रेससाठी 12 जागा सोडण्यास तयार नाहीत. याचमुळे पक्षाच्या नेत्यांनी अब्दुल्ला यांची भेट घेत काँग्रेसच्या मागणीसंबंधी चर्चा केली आहे.