जम्मू-काश्मीरच्या उपराज्यपालांचा मोठा निर्णय
वृत्तसंस्था / जम्मू
काश्मिरी पंडित समुदायाशी संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांवरून जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी मोठा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान पॅकेज अंतर्गत राज्याच्या शासकीय विभागांमध्ये कार्यरत काश्मिरी पंडितांना सुरक्षित जिल्ह्य़ांमध्ये नियुक्त करण्यात येणार आहे. काश्मीर खोऱ्यातील तहसील कार्यालयांवर अलिकडच्या काळात झालेले दहशतवादी हल्ले पाहता काश्मिरी पंडित असलेल्या कर्मचाऱ्यांना सुरक्षित जिल्ह्य़ांमध्येच नियुक्त करण्यात येणार असल्याचे सिन्हा यांनी गुपकार आघाडी तसेच भाजप शिष्टमंडळाला कळविले आहे.
दहशतवाद्यांनी काही दिवसांपूर्वी बडगाम जिल्ह्य़ातील चाडूरा तहसील कार्यालयात घुसून काश्मिरी पंडित असलेले कर्मचारी राहुल भटची गोळ्य़ा घालून हत्या केली होती. या घटनेनंतर काश्मिरी पंडितांनी जम्मू-काश्मीरमध्ये उग्र निदर्शन केली होती. शासकीय नोकरीत असलेल्या काश्मिरी पंडितांची बदली जम्मूमध्ये करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली होती.
बडगाम येथे दहशतवाद्यांकडून राहुल भट यांची हत्या करण्यात आल्यावर 350 हून अधिक काश्मिरी पंडित असलेल्या कर्मचाऱयांनी राजीनामा दिला होता. या पार्श्वभूमीवर उपराज्यपाल मनोज सिन्हा यांच्याकडून त्यांना बदलीसंबंधी आश्वासन देण्यात आले आहे.
टार्गेट किलिंग विरोधात कारवाई करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य सुरक्षा दलांना देण्यात आले आहे. दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. पीएम पॅकेजशी निगडित सर्व कर्मचाऱ्यांना सुरक्षित जिल्ह्य़ात नियुक्त केले जाईल असे सिन्हा यांनी सांगितले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र रैना आणि महासचिव अशोक कौल यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने उपराज्यपाल सिन्हा यांची भेट घेतली होती.