वृत्तसंस्था / श्रीनगर
जम्मूला काश्मीर खोऱ्याशी थेट जोडणाऱ्या उधमपूर-श्रीनगर रेल्वेमार्गाचे निर्मितीकार्य पूर्ण होत आले आहे. पुढील वर्षाच्या प्रारंभी हा प्रकल्प पूर्ण होणार असून त्यानंतर जम्मूहून थेट काश्मीरला जाता येणार आहे. हा मार्ग अतिशय दुष्कर असला तरीही अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करुन हा प्रकल्प करण्यात येत आहे, अशी माहिती रेल्वे विभागाने शुक्रवारी पत्रकारांना दिली.
हा 119 किलोमीटर लांबीचा रेल्वेमार्ग असून त्याचे 96 टक्के काम पूर्ण झाले आहे. आता केवळ अत्यल्प काम उरलेले आहे. कात्रा ते बनिहाल पर्यंतचा मार्ग पूर्ण झाला आहे. ऊर्वरित काम येत्या दीड महिन्यांमध्ये होणार आहे. त्यानंतर हा रेल्वेमार्ग जनतेसाठी मोकळा केला जाणार आहे. या मार्गामुळे उधमपूर ते श्रीनगर हे अंतर केवळ दीड ते दोन तासांमध्ये काटले जाणार आहे.
अत्यंत अडचणीचा मार्ग
हा प्रकल्प साकारताना रेल्वे विभागाला अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागले. या मार्गात तब्बल 38 बोगदे असून त्यांच्यापैकी टी-49 हा बोगदा सर्वाधिक, अर्थात 12.5 किलोमीटर लांबीचा आहे. तो देशातलाही सर्वात लांब वाहतूक बोगदा ठरणार आहे. याशिवाय, या मार्गावर 927 लहान मोठे सेतू निर्माण करावे लागले आहेत. त्यांच्यापैकी चिनाब नदीवरचा सेतू सर्वाधिक 359 मीटर उंचीचा आहे. तो फ्रान्सच्या आयफेल मनोऱ्यापेक्षाही 35 मीटर अधिक उंच आहे. या प्रकल्पाला एकंदर 1,400 कोटी रुपयांचा खर्च आल्याची महिती देण्यात आली आहे.
अशक्य ते होत आहे शक्य
जम्मू ते काश्मीर अशा डोंगराळ आणि उंचसखल भागात हा रेल्वेमार्ग आहे. त्याचे निर्मिती कार्य शक्य होईल, असे काही वर्षांपूर्वीपर्यंत कोणालाही शक्य वाटत नव्हते. मात्र, भारतीय रेल्वेने हे आव्हान स्वीकारून आता अशक्य ते शक्य करुन दाखविण्याच्या नजीक पोहचण्यात यश मिळविल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.