मुख्यमंत्र्यांना भेटल्याशिवाय माघार नाही
जत प्रतिनिधी
जत तालुक्याच्या आठ तलावातील पाणी घेऊन संत बागडेबाबा पाणी संघर्ष समितीचे निमंत्रक तुकाराम बाबा महाराज यांच्या सह बावीस जणांच्या शिष्टमंडळाने मंगळवारी सांगली येथे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांना भेटून निवेदन दिले. तेथून कृष्णाघाटावर पायी जात कृष्णेचे पाणी घेऊन सायंकाळी शिष्टमंडळ मुंबईकडे रवाना झाले आहे. या शिष्टंडळाचे नेतृत्व तुकाराम बाबा महाराज व ज्येष्ठ पत्रकार दिनराज वाघमारे हे करीत आहेत.
दरम्यान, शिष्ठमंडळ मंगळवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचताच सांगली पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी शिष्टमंडळाने मुंबईला जाऊ नये, यासाठी मनधरणी केली. मात्र, शिष्टमंडळ पोलिसांचे म्हणणे ऐकून घेऊन सायंकाळी मुंबई कडे रवाना झाले आहे.
तालुक्यातील विस्तारित म्हैसाळ योजनेला तात्काळ मंजुरी देऊन त्याला निधीची तरतूद करावी. या योजनेला लागणारा कालावधी पाहता तात्पूरत्या स्वरूपात जलसंपदा विभागाने सर्वे करून मायथळ कालव्यातून व्हसपेठ तलावात पाणी देण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला होता. मात्र, लवादाकडे पाण्याची तरतूद नसल्याने तो प्रस्ताव ही पडूनच आहे. त्याचा ही विचार शासनाने करावा, अशी विनंती शिष्ठमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटून करणार आहे.मुख्यमंत्र्यांना भेटल्याशिवाय माघार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे. ज्या कलशातून ते पाणी घेऊन जात आहेत, त्यावर पाणी देता का कर्नाटकात जाऊ, असा मजकूर लिहून एक प्रकारे राज्य सरकार विषयी तीव्र भावना व्यक्त केली आहे.