ऑनलाईन टीम/तरुण भारत
सर्वोच्च न्यायालयाचे नवे सरन्यायाधीश उदय लळीत ( Uday Lalit Chief Justice of India) यांचा काल मुंबई उच्च न्यायालयाच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी सरन्यायाधीशांवर कौतुकाचा वर्षाव केला होता. यावरुन काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर सुनावणी सुरू असताना मुख्यमंत्र्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांसोबत एका व्यासपीठावर बसणे हे संकेतांना धरून नाही, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सरकारच्या वैधतेची गंभीर सुनावणी सुरु आहे, असे असताना मुख्यमंत्र्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांसोबत एका व्यासपीठावर बसणे याबाबतचा आक्षेप जयंत पाटील यांनी ट्विटमध्ये व्यक्त केला आहे.
“सरन्यायाधीश यांना व्यासपीठावर बसवणं चुकीचं आहे. घटनापीठाकडे खटला सुरू असताना सरन्यायाधीशांना कार्यक्रमात नेणं हे चुकीचं आहे”, असं जयंत पाटलांनी म्हणलं आहे. याबाबत राज्यपालांना भेटणार का, असा प्रश्न विचारला असता याबाबत टाइमपास करायला आमच्याकडे वेळ नाही, अशी खोचक प्रतिक्रिया पाटील यांनी दिली आहे.
सचिन सावंत यांची टीका
काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनीही मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टीका केली आहे. शिंदे फडणवीस सरकारची वैधता आणि कायदेशीरता स्वतः माननीय सर्वोच्च न्यायालयाद्वारे तपासली जात असताना आणि केवळ सध्याचे राज्य सरकारच नाही तर राज्याचे नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीला देखील अपात्र ठरवले जाऊ शकते अशी परिस्थिती असताना व्यासपीठावरील विसंगती उठून दिसणे साहजिकच आहे, असं सावंत यांनी म्हटलं आहे.