नवी दिल्ली / वृत्तसंस्था
काँग्रेस नेते आणि राष्ट्रीय प्रवक्ते जयवीर शेरगिल यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकला आहे. शेरगिल यांनी पत्राद्वारे काँग्रेस हायकमांडकडे राजीनामा पाठवला आहे. आपल्या राजीनामापत्रामध्ये शेरगिल यांनी पक्षातील बदललेल्या वातावरणाविषयी सडेतोड भूमिका मांडली आहे. गेल्या आठवडय़ातच गुलाम नबी आझाद यांनी प्रचार समिती आणि आनंद शर्मा यांनी हिमाचल काँग्रेस सुकाणू समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. अशा स्थितीत जयवीर शेरगिल यांचा राजीनामा काँग्रेससाठी नवी अडचण ठरू शकते.
राजीनामा देताना शेरगिल यांनी पक्षात लाळघोटेपणा वाढत असल्याची टीका केली आहे. तसेच, समाजहितासाठी पक्षात निर्णय होत नसल्याचेदेखील त्यांनी म्हटले आहे. “मला हे सांगताना वाईट वाटत आहे की पक्षात आता लोकांच्या आणि देशाच्या हितासाठीचे निर्णय घेतले जात नाहीत. त्याऐवजी निर्णय प्रक्रियेवर काही विशिष्ट लोकांच्या स्वार्थी हेतूचा प्रभाव असल्याचे दिसून येते, असा थेट आरोप त्यांनी केला. राष्ट्रीय प्रवक्ते असलेल्या शेरगिल यांना गेल्या काही महिन्यांपासून पत्रकार परिषद घेण्यापासून रोखण्यात आले होते.