ऑनलाईन टिम : देवघर
झारखंडमधील एका रोपवेवर तांत्रिक बिघाडामुळे दोन केबल कार एकमेकांवर आदळल्याने 40 हून अधिक लोक हवेत केबल कारमध्ये अडकले असून या बचावा दरम्यान एका महीलेचा मृत्यू झाल्याची घटना समोर येत आहे.
झारखंडच्या देवघर जिल्ह्यातील त्रिकुट हिल्समध्ये केबल कारमध्ये अडकलेल्या लोकांच्या बचाव मोहिमेदरम्यान दोरीच्या सहाय्याने खाली उतरवण्यात येत असताना हा अपघात झाला. या घटनेचा व्हिडीयो सोशल मिडीयावर फिरत असून व्हिडिओमध्ये महिला तोल जावून जमिनीवर पडताना दिसत आहे. गंभीर जखमी झालेल्या या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, असे उपचारासाठी आणलेल्या रुग्णालयातील सिव्हिल सर्जनने सांगितले.
सोमवारी हवाई दलाच्या हेलिकॉप्टरने सुटका करताना आणखी एका व्यक्तीलाही जीव गमवावा लागला होता. हेलिकॉप्टर वर जात असताना या व्यक्तीची दोरीवरील पकड सुटली आणि तो जमिनीवर पडला. असे बचाव अधिका-यांनी सांगितले. यानंतर भारतीय हवाई दल, लष्कर, इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) यांच्या संयुक्त पथकाने राबविलेल्या बचाव मोहिमेत तीन केबल कारमध्ये हवेत अडकलेल्या सर्वांची आज सुटका करण्यात आली.