मेट्रो शहरांपासून प्रारंभ, पुढील वर्षअखेरपर्यंत गावागावातही सेवा
मुंबई / वृत्तसंस्था
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने सोमवारी 45 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत 5-जी सेवा सुरू करण्याची घोषणा केली. येत्या ऑक्टोबरपासून म्हणजेच दिवाळीत मेट्रो शहरांपासून 5-जी सेवेचा धुमधडाक्यात प्रारंभ सुरू होऊन 2023 पर्यंत ही सेवा संपूर्ण भारतात उपलब्ध होईल, असे कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी जाहीर केले. याचदरम्यान, आता आकाश अंबानी ‘जिओ’, ईशा अंबानी ‘रिटेल’ आणि अनंत अंबानी ‘न्यू एनर्जी बिझनेस’ची जबाबदारी हाताळणार असल्याचेही स्पष्ट केले.
रिलायन्स इंडस्ट्रीजची वार्षिक सर्वसाधारण बैठक सोमवारी पार पडली. या बैठकीत गुंतवणूकदारांसमोर बोलताना मुकेश अंबानी यांनी कंपनीच्या कामगिरीचा आढावा मांडताना भविष्याच्यादृष्टीने महत्त्वाच्या घोषणा केल्या. जिओ 5-जी हे जगातील सर्वात मोठे आणि सर्वात प्रगत नेटवर्क असेल, असे स्पष्ट केले. कंपनी 5-जी सेवेसाठी 2 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. कंपनी दिवाळीपर्यंत दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता यासह अनेक मोठय़ा शहरांमध्ये 5-जी लाँच करणार आहे. डिसेंबर 2023 पर्यंत संपूर्ण भारतात 5-जी सेवा विस्तारेल. हे जाळे विस्तारण्यासाठी कंपनीने मायक्रोसॉफ्ट, मेटा आणि इंटेलसोबतही भागिदारी केली आहे, असे सांगण्यात आले. ही सेवा देतानाच त्यासाठी अत्यावश्यक असलेला स्मार्टफोन या वर्षाच्या अखेरीस लॉन्च केला जाईल, असे संकेतही देण्यात आले. या स्मार्टफोनची संभाव्य किंमत 10 ते 12 हजार रुपये असू शकते.
पर्यावरणपूरक उत्पादनांवर भर
रिलायन्स जिओ 5-जी इंटरनेट सेवा सुरू करण्यासह ग्रीन एनर्जी आणि इतर क्षेत्रात रिलायन्स कोणती पावले उचलणार याकडे अनेकांचे लक्ष लागले होते. रिलायन्स ग्रीन एनर्जीवर लक्ष केंद्रीत करणार असल्याचे अंबानी यांनी मागील वार्षिक सर्वसाधारण बैठकीत जाहीर केले होते. कंपनीने मागील वषी सोलर मॉडय़ुल्स, हायड्रोजन इलेक्ट्रोलायजर्स, फ्यूएल सेल्स आणि स्टोरेज बॅटरी तयार करण्यासाठी 4 गीगा-फॅक्टरीज तयार करण्याची घोषणा केली होती. रिलायन्सने जागतिक पातळीवर ग्रीन एनर्जीशी संबंधित काही लहान कंपन्यांना अधिग्रहित केले आहे.
नव्या ‘युवा’ पिढीकडे सोपविली धुरा...
आकाश अंबानी यांच्याकडे जिओ, ईशा अंबानी यांच्याकडे रिटेल आणि अनंत अंबानी यांच्याकडे ग्रीन एनर्जी उद्योगाची धुरा सोपवण्याचा निर्णय मुकेश अंबानी यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत जाहीर केला. आकाश आणि ईशा सुरुवातीपासून रिलायन्सच्या ग्राहक व्यवसायात गुंतलेले आहेत. अनंत देखील ‘एनर्जी’मध्ये लक्ष देताना जामनगरमधील प्रकल्पात अधिक भर देत असल्याचे त्यांनी सांगितले. तिघांनाही कंपनीचे वरि÷ अधिकारी दररोज मार्गदर्शन करतात. तसेच माझ्यासह संचालक मंडळही त्यांच्या पाठीशी असल्याचे अंबानी पुढे म्हणाले. रिटेल व्यवसायाविषयी माहिती देताना ईशा अंबानी यांनी जिओ मार्ट देशातील 260 शहरांपर्यंत पोहोचले असून आता रिलायन्स एफएमसीजी व्यवसायही सुरू करणार असल्याचे स्पष्ट केले.
‘एजीएम’मधील महत्त्वाच्या घोषणा…
जिओ 5-जी ही जगातील अद्ययावत इंटरनेट सेवा असेल असा निर्वाळा
दिवाळीत मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नईत 5-जी सेवा सुरू करणार
डिसेंबर 2023 पर्यंत 5-जी सेवा देशातील प्रत्येक गावात पोहचवणार
रिलायन्स जिओ 5-जी नेटवर्ककरिता दोन लाख कोटींची गुंतवणूक
जिओ एअरफायबरची घोषणा, ब्रॉडबॅण्ड इंटरनेट स्पीड अधिक असणार
रिलायन्स जिओ स्टॅण्डअलोन तंत्रज्ञानाचा वापर प्रभावीपणे करणार
स्वदेशी 5-जी इंटरनेट सेवेसाठी दिग्गज तंत्रज्ञान कंपन्यांशी भागिदारी
रिलायन्सची देशात स्वस्त 5-जी स्मार्टफोन लाँच करण्याचीही तयारी
2023 पर्यंत रिलायन्स बॅटरी उत्पादन निर्मिती क्षेत्रातही उतरणार
जामनगरमध्ये होणार पॉवर इलेक्ट्रॉनिक्स-सॉफ्टवेअर सिस्टिम प्रकल्प