ऑनलाईन टीम / मुंबई :
राणा दाम्पत्याच्या मातोश्रीवरील हनुमान चालीसा पठणाच्या हट्टामुळे घडलेल्या नाटय़मय घडामोडींमुळे राज्यातील वातावरण तापलं आहे. शिवसेना आणि भाजप यांच्यातील वाद या प्रकरणामुळे शिगेला पोहचला असून, राज्यात राष्ट्रपती राजवट (presidential rule in maharashtra) लागू करावी, अशी मागणी केंद्रीय मंत्री नारायण राणे (narayan rane) यांच्यासह भाजपच्या काही नेत्यांनी केली आहे. दरम्यान, या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड (jitendra awhad)यांनी एक ट्विट केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
“राष्ट्रपती राजवट लावा, लै मजा येईल…” असं ट्वीट आव्हाड यांनी केलं आहे. राणा दाम्पत्याच्या मातोश्रीवरील हनुमान चालीसा पठणाच्या घोषणेनंतर संतापलेल्या शिवसैनिकांनी राणांच्या घराबाहेर केलेलं आंदोलन, त्यानंतर राणा दाम्पत्याने पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याचं कारण देत आपला निर्णय मागे घेणं, भाजपा नेते मोहित कंबोज, किरीट सोमय्या यांच्यावर शिवसैनिकांचा हल्ला आणि राणा दाम्पत्याची अटक या सगळय़ाच्या पार्श्वभूमीवर भाजपने महाविकास आघाडीविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. किरीट सोमय्या यांच्या नेतृत्वाखाली भाजप नेत्यांचे शिष्टमंडळ आज सकाळी दिल्लीत दाखल झाले. थोडय़ाचवेळात ते केंद्रीय गृहसचिव अजय कुमार भल्ला यांची भेट घेणार आहेत.
भाजपच्या नेत्यांकडून राज्यातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आल्याचे सांगून सातत्याने राष्ट्रपती राजवटीची भाषा केली जात आहे. त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रपती राजवट लावा, लै मजा येईल, असं ट्विट करून भाजपला डिवचले आहे. मात्र, या ट्विटमुळे जितेंद्र आव्हाड यांना नेटिझन्सने ट्विटरवर ट्रोल केले आहे. एवढ्यातच का?…. तुम्हीही महाविकास आघाडीला वैतागले का? असे प्रश्न नेटिझन्सकडून उपस्थित केले जात आहेत.