ऑनलाईन टीम/तरुण भारत
काँग्रेसचा हात सोडत जम्मू-काश्मीरच्या राजकारणात नवी इनिंग सुरू करणारे काँग्रेसचे माजी नेते गुलाम नबी आझाद (ghulam nabi azad) यांना दहशतवादी संघटनेकडून धमकी देण्यात आली आहे. लष्कर-ए-तैयबाशी संलग्न असलेल्या द रेझिस्टन्स फ्रंट (TRF) या संघटनेने ही धमकी दिली आहे. दहशतवादी संघटनेने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर धमकीचे पोस्टर जारी केले आहे.
दहशतवादी संघटनेने एक पोस्टर जारी केले आहे. जम्मू-काश्मीरच्या राजकारणात गुलाम नबी आझाद यांचा प्रवेश अचानक झालेला नाही, असे दहशतवादी संघटनेने यामध्ये म्हंटले आहे. त्यांच्या जुन्या राजकीय पक्षात असताना त्यांनी ठरवलेल्या सुविचाराचा हा भाग आहे. त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्याशी बंद दाराआड बैठक घेतली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासोबतही बैठक घेतली आहे. भारतीय जनता पक्षाने आपल्या राजकीय अजेंड्यासाठी विस्थापित काश्मिरी पंडितांचा वापर केल्याचे पोस्टरमध्ये लिहिले आहे.
नुकतेच गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेस सोडून नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली आहे. सध्या त्यांचा पक्ष जम्मू-काश्मीरच्या राजकारणावर लक्ष केंद्रित करेल, असे त्यांनी म्हटले आहे. नुकतेच त्यांनी बारामुल्ला येथून ‘मिशन काश्मीर’ सुरू केले. या रॅलीत त्यांनी कलम 370 बाबतही मोठी गोष्ट सांगितली. आझाद म्हणाले होते की, माझ्यावर असा आरोप आहे की, विरोधी पक्षनेता असल्याने मी कलम 370 परत लागू करू शकत नाही. माला संसदेत संख्याबळ कुठून मिळणार? राजकीय फायद्यासाठी मी लोकांना कधीच मूर्ख बनवत नाही, माझ्यासाठी जे शक्य नाही ते मी कधीही वचन देत नाही.