पुणे / प्रतिनिधी :
अभियांत्रिकी क्षेत्रात मागणीपेक्षा पुरवठा अधिक झाल्याने गुणवत्तेचा दर्जा घसरला आहे. या स्थितीत सागरी क्षेत्रात नोकरीची संधी निर्माण झाली असून, विद्यार्थ्यांनी त्याकडे लक्ष दयावे, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केली.
अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेतर्फे संस्थेच्या आवारात जेधे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये उभारण्यात आलेल्या सागरी दुर्मिळ वस्तू, उपकरणे व यंत्रसामुग्री संग्रहालयाचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते झाले. या वेळी विकफिल्ड फूड्सचे सीएमडी मुकेश मल्होत्रा,अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या सरचिटणीस श्रीमती प्रमिला गायकवाड व आयएमएफचे अध्यक्ष डॉ. आनंद दीक्षित, भगवानराव साळुंखे, विजयसिंह जेधे, नवनाथ पासलकर व अन्य मान्यवर उपस्थित होते.
पवार म्हणाले, मराठा आरमाराचा इतिहास नवीन पिढीला माहीत नाही. तेव्हाची यंत्रणा कशी होती, हे कळाले पाहिजे. या सागरी संग्रहालयामुळे विद्यार्थ्यांना संशोधनाची, अभ्यासाची, शिक्षणाची नावे दारे खुली होतील, यात शंका नाही. भारतीय नौदलाच्या सक्षमीकरणालाही यातून मदत मिळेल. अलीकडे इंजिनरिंगला जाण्याची मुलांमध्ये स्पर्धा निर्माण झाली असून, मागणीपेक्षा पुरवठा जास्त असल्याने गुणवत्ता राहिलेली नाही. मात्र, मुलांनी अन्य क्षेत्रांकडेही लक्ष द्यावे. कारण भविष्यात यातून नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. सागरी क्षेत्र हे भक्कम वेतन देणारे आहे. कान्होजी आंग्रे यांचा वारसा सांगणाऱ्या भावी पिढीने या क्षेत्राकडे सकारात्मक रीतीने पहावे, असे आवाहनही त्यांनी केले.