धामणे येथील शेतकऱयांच्या सभेत आवाहन
वार्ताहर/ धामणे
ग्रामीण भागात अनेक नागरी समस्या असताना शेतकऱयांच्या सुपीक जमिनीतून रिंगरोड करून शेतकऱयांच्या 1400 ते 1500 एकर शेतजमिनी घशात घालण्याचा घाट सरकारने घातला आहे. तो उधळून लावण्यासाठी सर्व राजकीय मतभेद बाजूला ठेवून रिंगरोडला विरोध करण्यासाठी दि. 28 रोजी काढण्यात येणाऱया चाबूक मोर्चात धामणे व परिसरातील शेतकरी बांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन धामणे येथील बसवाण्णा मंदिरात दि. 22 रोजी आयोजित शेतकऱयांच्या सभेत कृषक समाज कर्नाटक रयत संघटनेचे नेते सिद्धगौडा पाटील यांनी केले. सभेच्या अध्यक्षस्थानी धामणे ग्रामपंचायत अध्यक्षा योगीता बेन्नाळकर होत्या.
सभेच्या सुरुवातीला यल्लाप्पा रेमाणाचे यांनी आयोजित सभेविषयी माहिती दिली. याप्रसंगी उपस्थित नेतेमंडळीनी रिंगरोडला विरोध करण्यासाठी तालुक्यातील सर्व शेतकऱयांनी दि. 28 नोव्हेंबर रोजीच्या चाबुक मोर्चात मोठय़ा संख्येने सहभागी होवून हा मोर्चा यशस्वी करण्याचे आवाहन करण्यात आले.
या सभेत माजी आमदार मनोहर किणेकर, युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके, माजी महापौर शिवाजी सुंठकर, श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर, ऍड. सुधीर चव्हाण, प्रकाश मरगाळे, मनोज पावशे यांनी रिंगरोडला विरोध करण्याची नितांत गरज आहे. नाहीतर ग्रामीण भागातील शेतकरी देशोधडीला लागणार आहे. म्हणून सर्व शेतकऱयांनी या चाबुक मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले. ग्रामपंचायत सदस्य एम. आर. पाटील यांनी धामणे व परिसरातील शेतकरी व युवक या चाबुक मोर्चात मोठय़ा संख्येने सहभागी होणार आहेत. आणि हा मोर्चा यशस्वी करुया, असे सांगितले. सभेला ग्रामपंचायत सदस्य पंडीत पाटील, माजी सदस्य विजय बाळेकुंद्री, राजू बडगेर, देवस्थान पंच महादेव चौगुले आणि कुरबरहट्टी, मासगौंडहट्टी, देवगणहट्टी येथील शेतकरी व नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.