भाजपचे विरोधी पक्षांना आवाहन : हा उपक्रम देशासाठी, पक्षासाठी नाही,भाजप प्रवक्ते यतीश नाईक, रुपेश कामत यांनी पत्रकार परिषद
प्रतिनिधी /पणजी
‘आजादी का अमृतमहोत्सव – हर घर तिरंगा’ या देशभक्ती उपक्रमांचे विरोधी पक्षांनी राजकारण करु नये तर त्यात सामील व्हावे असे आवाहन भाजपने केले असून भाजपची राष्ट्रनिती व काँग्रेसची राजनिती चालू असल्यामुळेच अनेक नेते भाजपात येत असल्याचे पक्षाने म्हटले आहे.
भाजपचे प्रवक्ते यतीश नाईक आणि रुपेश कामत यांनी पत्रकार परिषदेत वरील आवाहन करुन सांगितले की, काँग्रेसचे गोव्यातील नेते तसेच आजी-माजी अध्यक्ष या उपक्रमावरुन विनाकारण भाजपवर आगपाखड करीत आहेत. तसेच आरएसएसवर देखील त्यांनी निशाणा साधला आहे. हे उपक्रम देशाचे आणि देशासाठी आहेत. ते भाजप किंवा कोणत्याही पक्षाचे नव्हेत, असे नाईक व कामत म्हणाले.
भाजप हा राष्ट्रभक्ती, देशप्रेम – राष्ट्रनिर्माण सर्वोच्च मानतो आणि त्यास प्रथम प्राधान्य देतो. राष्ट्र प्रथम, पक्ष नंतर अशी भाजपची भूमिका आहे. त्याच प्रेरणेतून पंतप्रधान मोदी यांनी आजादी का अमृतमहोत्सव व हर घर तिरंगा हे उपक्रम करण्याचे आवाहन जनतेला केले आहे. ही मोहीम देशाची आहे. ती पक्षाची नव्हे याकडे त्यांनी लक्ष वेधले. सर्व विरोधी नेत्यांनी भारतीय असल्याचा अभिमान बाळगून ही मोहीम यशस्वी करावी, असे आवाहन त्या दोघांनी केले. काँग्रेसने तिरंग्याचे राजकारण करु नये, असेही कामत-नाईक यांनी नमूद केले.