हरिद्वार, नवी दिल्ली / वृत्तसंस्था
उत्तराखंडमधील जोशीमठ येथील दरड कोसळण्याचे आणि भूस्खलनाचे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे. स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतीजी महाराज यांनी शनिवारी आपल्या वकिलामार्फत सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचे माध्यम प्रभारी डॉ. शैलेंद्र योगी उर्फ योगीराज सरकार यांनी शनिवारीच यासंबंधी प्रसारमाध्यमांना माहिती दिली.
गेल्या आठवडय़ापासून जोशीमठ परिसरात अनेक घरे आणि इमारतींना तडे गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तसेच रस्ते आणि जमीन खचण्याच्या घटनाही निदर्शनास आल्यानंतर येथे केंद्रीय पथक दाखल झाले आहे. त्याचबरोबर आता शनिवारी मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी जोशीमठ येथे जाऊन बाधितांची भेट घेतली. जोशीमठमध्ये झालेल्या भूस्खलनामुळे 800 हून अधिक इमारतींना तडे गेले आहेत. त्याबाबत राज्य सरकार अलर्ट मोडवर आले आहे.
जोशीमठ शहर व परिसरात दरड कोसळण्याचे आणि घरांना तडे जाण्याचे प्रकार सुरूच आहेत. आणखी काही घरांमध्येही भेगा पडल्यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण आहे. जोशीमठच्या सिंहधर वॉर्डात दरड कोसळण्याचे प्रमाण वाढत आहे. जोशीमठमध्ये भूस्खलनामुळे ज्योतिर्मठ आणि भगवान बद्रीनाथ यांच्या हिवाळी निवासस्थानाचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी जमिनीला तडेही पडत आहेत. जोशीमठ येथील परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी सरकारने आठ सदस्यीय तज्ञांचे पथक पाठवले आहे. भूस्खलनाचे कारण तपासले जात आहे. समस्येचे निराकरण करण्यासाठी वेगवेगळय़ा बाजू तपासून पाहिल्या जात आहेत.
आतापर्यंत 109 कुटुंबांना बाधित भागातून हलवण्यात आले आहे. यापैकी 49 कुटुंबांना प्रशासनाने मदत छावण्यांमध्ये सामावून घेतले आहे. आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदतकार्य सुरू करता यावे यासाठी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून एनडीआरएफ या भागात तैनात करण्यात आले आहे.