हिंदू आणि बौद्ध धर्मियांसाठी पवित्र स्थळ म्हणून विख्यात असलेल्या उत्तराखंडातल्या चमोली जिल्हय़ातील जोशीमठ येथील घरे, हॉटेल्स यांना तडे पडू लागल्याने तेथील नागरिक सध्या भूस्खलनाच्या संकटाने भयग्रस्त झालेले आहेत. भारतातील तरुण गणल्या जाणाऱया हिमालयाच्या पर्वतरांगांत समुद्र सपाटीपासून 1875 मीटर उंचीवरती वसलेले आणि पर्यटकांसाठी आकर्षण बिंदू ठरलेले शहर ढासळण्याच्या वाटेवर आहे. बद्रीनाथाच्या पवित्र तीर्थक्षेत्राच्या आणि चारधामच्या एकंदर वाटेवरचे प्रवेशद्वार ठरलेले हे उत्तराखंड राज्यातले शहर झपाटय़ाने आणि पर्यावरणीय नियम आणि अटींची पायमल्ली करून विकसित झाल्याकारणाने गेल्या दशकभरापासून नानाविध नैसर्गिक प्रकोपांना सामोरे जात आहे. चमोली जिल्हय़ातल्या बद्रीनाथ तीर्थक्षेत्राच्या पायथ्याशी वसलेल्या घरांना आकस्मिकरित्या भेगा पडण्यास, रस्त्यांना तडे जाण्यास, भूगर्भातून पाणी बाहेर येण्यास सुरुवात झाल्याने जोशीमठ येथील लोक भयग्रस्त झालेले आहेत. भारत-तिबेट सीमेपासून जवळ असल्याने भारतीय सैन्याचा तळ इथे असून त्यामुळे गिर्यारोहक, धार्मिक आणि सांस्कृतिक पर्यटकांसाठी प्रसिद्ध असणारे हे शहर संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरलेले आहे.
दक्षिण भारतातल्या केरळातून इथे आलेल्या आदी शंकराचार्यांनी शृंगेरी, पुरी, द्वारका, कांचीप्रमाणे जोशीमठ इथे आपल्या मठाची स्थापना केल्याने, त्याला धार्मिक स्थळ म्हणून विशेष नावलौकिक लाभला. कत्यूरी राजवटीत सातव्या ते अकराव्या शतकात जोशीमठाला राजधानीचा सन्मान लाभला होता. बौद्ध धर्मपरंपरेतल्या बासदेव मंदिराचा उल्लेख वसुदेव असा होत असून, हिंदू धर्मियांसाठी हे स्थळ वंदनीय ठरलेले असून, बदीनारायण, राजराजेश्वरी, भविष्य केदार आणि देव-देवतांच्या मंदिरांमुळे जोशीमठ प्रसिद्धीच्या शिखरावरती पोहोचलेले आहे. गरी भवानी, कल्पेश्वराचेही मंदिर जोशीमठाचे धार्मिक संचित ठरलेले आहे. हिमालयाच्या पर्वत शिखरांवरती गिर्यारोहण, मोसमी रंगीबेरंगी फुलांनी समृद्ध खोऱयात भटकंती करण्यासाठी देशी-विदेशी पर्यटकांची पाऊले जोशीमठहून पडत असल्याने, सोळा हजाराच्या आसपास लोकसंख्या असलेल्या या शहरात पर्यटकांसाठी हॉटेल्स, साधनसुविधा झपाटय़ाने विस्तारत गेल्या आणि जोशीमठाची वाटचाल भकास करणाऱया विकासाच्या दिशेने सुरू झाली. सध्या पवित्र मठाच्या परिसरात असलेले शिवमंदिर पाच इंच खचले आणि तेथील शिवलिंगाचेही नुकसान झाले. घरांचे तडे आणि भिंत खचण्याच्या वाढत्या घटनांमुळे जोशीमठ भागात राहणाऱया नागरिकांचे भय वाढले आहे.
ज्योतिर्मठ या नावाने परिचित असलेले हे शहर पर्यावरणीय दृष्टिकोनातून अतिसंवेदनाक्षम क्षेत्रात येत असून इथे विकासाचे गोंडस नाव धारण करून आलेल्या प्रकल्पांमुळे आजची स्थिती निर्माण झाली असल्याची भावना तीव्र झालेली आहे. राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा मंडळाने तपोवन-विष्णुगड जलविद्युत प्रकल्पासाठी बोगदा तसेच अन्य कामे अराजकपणे आरंभल्याने घरांना भेगा पडण्यास आरंभ झाल्याची लोकांची धारणा झालेली आहे. हा बोगदा खोदण्यासाठी स्फोटकांचा अनिर्बंधपणे वापर होत असल्याने घरांना भेगा पडण्याच्या प्रकरणांत वाढ झालेली आहे. गेल्या काही दशकांपासून चमोली ते जोशीमठ परिसरातल्या संकटांत वाढ झालेली आहे. भूगर्भ शास्त्रज्ञांच्या अभ्यासानुसार जोशीमठ हे शहर पर्यावरणीय दृष्टीने अतिसंवेदनाक्षम क्षेत्रात येत असून हिमनगासोबत वाहून येणाऱया मातीवरती हे शहर वसल्याचे मत आहे आणि त्यामुळे इथल्या शिलाखंडांना आणि भूगर्भाला धोके निर्माण करणे म्हणजेच भूस्खलनाला निमंत्रण देण्यासारखे आहे. भारत सरकारने 1964 साली गढवालचे तत्कालीन जिल्हाधिकारी एम. सी. मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली जोशीमठ आणि परिसरातल्या भूस्खलनाचा अभ्यास करण्यासाठी जी समिती नियुक्त केली होती, त्यांनी हे शहर जुन्या भूस्खलनाचा इतिहास असलेल्या पट्टय़ात वसलेले असून, इथे मोठय़ा प्रमाणात होणारी सिमेंट-काँक्रीटची बांधकामे, खोदकामे, भू-सुरुंगांचा वापर यावर निर्बंध घालण्याची शिफारस केली होती.
जलविद्युत निर्मितीसाठी उभारलेले प्रकल्प, रस्त्यांची निर्माण झालेली जाळी, तपोवन-विष्णुगड जलविद्युत प्रकल्पासाठी खोदलेला बोगदा अशा कामांमुळे जोशीमठ शहराचे अस्तित्वच संकटांनी वेढलेले आहे. तेथील पर्यावरणीय परिसंस्था आणि भूविज्ञानाला काडीची किंमत न देता विकासाचे जे प्रकल्प पुढे रेटले गेले आणि खासगी कंपनीच्या अहवालाच्या आधारावर विष्णुगड-तपोवन जलविद्युत निर्मिती प्रकल्पाला चालना देत, बोगद्याचे काम आततायीपणाने आरंभल्याने आज हे पवित्र शहर मृत्युच्या भयाण छायेखाली वावरत आहे. हिमनग वितळण्याच्या प्रक्रियेत पराकोटीची वृद्धी झाल्याने यापूर्वी 2021 मध्ये ऋषीगंगा आणि धवलगंगा नद्यांना आलेल्या महापूरात दोनशे जणांचे जीव गेले. त्यानंतर चार महिन्यांनी मुसळधार पर्जन्यवृष्टीत डोंगराचा एक भाग धनधारियात बुडला, तो उद्भवलेल्या भूस्खलनापायी. 2021 मध्ये उद्भवलेल्या 23 दुर्घटनांमध्ये 308 लोक मृत्युमुखी पडले, 61 जण बेपत्ता झाले, साडेपाच हजारांवर घरे कोसळली, एक हजरावर पाळीव प्राण्यांचे जीव गेले. शेतीचे प्रचंड नुकसान झाले. स्वातंत्र्यानंतर उत्तराखंडातल्या हिमालयाच्या पर्वतरांगांत बेसुमार जंगलतोड करण्यात आली. विविध विकास प्रकल्पांसाठी जाळपोळ करण्यात आली आणि त्यामुळे येथे मानव निर्मित संकटांबरोबर जागतिक तापमान वाढीमुळे हिमनग वितळण्याच्या प्रमाणात वृद्धी झाल्याने या एकंदर परिसराच्या अस्तित्वावर प्रतिकुल परिस्थिती उभी राहिलेली आहे.
नैसर्गिक साधनसंपत्ती आणि पर्यावरणाच्या व्यवस्थापनातल्या अराजकतेबरोबर नियोजनातल्या असंख्य त्रुटीमुळे भारतातल्या कोटय़वधी हिंदू आणि बौद्ध धर्मियांसाठी धार्मिक संचित ठरलेले जोशीमठ दिवसेंदिवस खचत जाण्याची प्रक्रिया तीव्र होत चालली आहे. हवामान बदल आणि जागतिक तापमान वाढीमुळे उत्तराखंडात उद्भवणाऱया ढगफुटी, मुसळधार पर्जन्यवृष्टी, महापूर, भूस्खलनासारख्या नैसर्गिक प्रकोपांत वारेमाप वृद्धी होत आहे, ही खरेतर धोक्याची घंटा आहे. निसर्ग आणि पर्यावरण यांच्या संरक्षण आणि संवर्धनाकडे डोळेझाक करून आज जोशीमठमध्ये राष्ट्रीय औष्णिक मंडळ आणि अन्य सरकारी आस्थापनांनी विकासाचे जे प्रकल्प हाती घेतले, तेव्हा त्यांनी इथल्या दुर्बल पर्वतांकडे दुर्लक्ष केले. सुंदरलाल बहुगुणा, गौरा देवी, चंडीप्रसाद भटसारख्या पर्यावरणवाद्यांनी चिपको चळवळीद्वारे वृक्षसंवर्धनाला दिलेल्या प्राधान्याला किंमत दिली नाही आणि त्यामुळे आज उत्तराखंडातल्या अन्य प्रांताप्रमाणे जोशीमठची परिस्थिती दिवसेंदिवस हलाखीची होत असून त्याची कडू फळे इथल्या सर्वसामान्यांच्या वाटय़ाला येऊ लागली आहे.
– राजेंद्र पां. केरकर