हद्द कायम करत स्मशानभूमीची जमीन समाजाच्या ताब्यात : २५ वर्षांनंतर प्रश्न मार्गी
प्रतिनिधी/अक्कलकोट
अक्कलकोट तालुक्यातील बोरगाव दे येथील मागासवर्गीय समाजाच्या स्मशानभूमीचा मार्ग मोकळा झाला. दि १७ जून रोजी शेतमालाकाच्या जमिनीवर शासनाने हद्द कायम करत १० गुठ्ठे शेतजमीन मागासवर्गीय समाजाच्या स्वाधीन केली.
सन १९८६ साली गट क्र ४३२/२ ही जमीन शासनाने भूसंपादन केली होती. पुढे १९९१ ला हरिजन स्मशानभूमी या नावाने नोंद सुद्धा झाली. पुढे १९९७ साली भूमिअभिलेखकडून मोजणी करून हद्द कायम करण्यात आली होती, पण संबंधित शेतमालकाच्या हरकतीमुळे सदरचा विषय प्रलंबित राहिला. जवळपास २५ वर्षांपासून बोरगाव येथील मागासवर्गीय समाज आपल्या हक्काच्या स्मशानभूमीसाठी संघर्ष करत होता.
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सुद्धा मागासवर्गीय लोकांना स्मशानभूमी असूनही जागेअभावी मरणाची भिती वाटत होती. आपल्या हक्काची स्मशानभूमीची जागा असूनही गेल्या २५ वर्षापासून मृतदेहावर अंत्यसंस्कार कुठे करायचे हा प्रश्न उद्भवत होता. शेतमालक व मागासवर्गीय समाज यांच्यात अनेकदा वादाची परिस्थिती निर्माण होत होती. मागासवर्गीय समाजातील लोक एकत्र येत जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, तहसीलदार यांच्याकडे सतत कागदोपत्री पाठपुरावा केला.अक्कलकोटचे तहसीलदार बाळासाहेब शिरसट यांनी सशुल्क पोलीस संरक्षण पुरवणे बाबत मागणी केली होती. दि १७ जून रोजी मंडळ अधिकारी ए.सी जमादार, तलाठी विष्णू चोरमुले भूकरमापक प्रभाकर शिंदे,सरपंच विलासराव सुरवसे, पोलीस पाटील अभिजीत पाटील, वागदरी बीटचे पोलीस हवालदार विपीन सुरवसे, पो कॉ.माळी व्ही एम, कोतवाल सुनील मुलगे यांच्या उपस्थित बोरगाव येथील हरिजन समाज स्मशानभूमीचे दहा गुंठे शेतजमीन हद्द कायम करीत समाजाच्या स्वाधीन केली.
पंचवीस वर्षापासून चाललेल्या लढ्याला अवघ्या चार दिवसात यश आले यामुळे उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रसिंह गौर, पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली वागदरी बीटचे पोलीस हवालदार विपिन सुरवसे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यामुळे मागासवर्गीय समाज बांधवातून पोलीस हवालदार विपीन सुरवसे यांचे कौतुक होत आहे. यावेळी विठ्ठल वाघमारे, बाळकृष्ण बनसोडे, कृष्णा रणझुंजारे, सुभाष नडगिरे, तेजस रणझुंजारे , धानप्पा बनसोडे, शरणाप्पा गायकवाड, चिदानंद रणझुंजारे, रोहिदास गायकवाड, बाळासाहेब वाघमारे, शिवशरण गायकवाड यासह समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते
मृत्युपश्चात ही मृतदेहाला हालअपेष्टा सहन कराव्या लागत होत्या. अंत्यसंस्कार करण्यासाठी वाट काढत जावे लागत होते. गेल्या पंचवीस वर्षापासून आमच्या या हक्काच्या स्मशानभूमीसाठी आम्ही लढा दिला. पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने आम्हाला न्याय मिळाला. विठ्ठल वाघमारे (बोरगाव ता. अक्कलकोट)
आमच्या वस्तीत निधन झाल्यावर मृतदेहावर अंत्यसंस्कार कुठे करायचे हा सगळ्यात मोठा प्रश्न होता. गेल्या अनेक वर्षापासून यासाठी आम्ही अनेक शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवले पण आम्हाला कोणीही थारा दिले नाहीत. पोलीस हवालदार विपीन सुरवसे यांनी आम्हाला खूप मोठा आधार देत आम्हाला न्याय दिले.- तेजस रणझुंजारे (बोरगाव दे., ता. अक्कलकोट)