मुंबई : पक्षविरोधी काम केल्याने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे नेते रामदास कदम आणि आनंदराव अडसूळ यांची पक्षातून हाकालपट्टी केली आहे. त्याबाबतची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. आज सकाळीच शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे याना खरमरीत पत्र लिहून नेतेपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर लगेचच उद्धव ठाकरे यांनी ही कारवाई केली आहे.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या विरोधात बंड पुकारले आणि तब्बल ४० आमदार फोडून थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाच आव्हान दिलं. त्यानंतर शिवसेनेत मोठा भूकंप झाला. शिवसेनेतल्या या ऐतिहासिक बंडानंतर आता बंडखोर नेत्यांची पक्षातून हकालपट्टी सुरू आहे. शिवसेनेच्या पुनर्बांधणीसाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी बंडखोर नेत्यांवर कठोर कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. शिवसेना नेते रामदास कदम आणि आनंदराव अडसूळ यांचीही आता पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
अडीच वर्षांपूर्वी मी सांगितले होते, मी निवडणूक लढणार नाही. विधानपरिषद ही मागितलेली नाही. माझ्या विरोधात खोट्या बातम्या देण्यात आल्या आहेत. मी भाजपमध्ये जाणार, असे सांगितले गेले. निष्ठावान असून आम्हाला त्रास दिला जात आहे. पण मी सांगू इच्छितो माझी हकालपट्टी केली तरी मी कडवा शिवसैनिक आहे. मरेपर्यंत मी शिवसैनिक राहणार, असे मत रामदास कदम यांनी पत्रकार परिषदेत मांडले आहे.
पुणे जिल्ह्यातील माजी मंत्री विजय शिवतारे यांची देखील दोन दिवसांपूर्वी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
हेही वाचा : नितीन राऊतांच्या मतदानावर भाजप खासदाराचा आक्षेप; मत बाद करण्याची मागणी