अध्याय चोविसावा
स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ या तिन्ही लोकांचे सविस्तर वर्णन करून झाल्यावर भगवंतांनी त्रैलोक्मयाच्या पलीकडे असलेल्या ध्रुवमंडल, महरलोक, जनोलोक, तपोलोक याबद्दल उद्धवाला संक्षिप्त माहिती दिली. त्यानंतर सत्यलोकाबद्दल सांगताना ते म्हणाले, अतिशय चारित्र्यवान, सत्यवचनी, उदार, दयावान अशा लोकांनाच सत्यलोकात जागा मिळते. तेथला अधिपती ब्रह्मदेव होय.
उद्धवा! ब्रह्मदेवाने माझ्या उपदेशानुसार तप करून सृष्टीनिर्मिती केली हे मी तुला मागे सांगितले आहेच. त्याने निर्माण केलेल्या सृष्टीत सत्यलोकापर्यंतच्या लोकांचा समावेश आहे. आता ब्रह्मदेवाने निर्माण केलेल्या सृष्टीव्यतिरिक्तही लोक आहेत त्या लोकांविषयी मी तुला माहिती देतो. सर्वप्रथम कैलासविषयी सांगतो. भोळय़ा शंकराने ब्रह्मांडाहून वेगळा असा कैलास निर्माण केला आहे आणि मेघश्याम विष्णूने वैकुंठ निर्माण केले आहे. हे लोक त्यांनी आपापल्या लीलांनी तयार केले आहेत.
ब्रह्मांडाची निर्मिती अथवा त्याचा प्रलय झाला तरी वैकुंठ आणि कैलास ह्यांना धक्का लागत नाही. तेथील राहण्याची विलक्षण गोडी विष्णुभक्त आणि शंकरभक्त हेच खरोखर जाणतात. तेथे काळाचा प्रवेशही होत नाही, कर्माचे बंधन नाही, जन्ममरण नाही. ज्यांची नि÷ा केवळ माझ्याठायी जडलेली असते अशा अनन्य भक्तांनाच हे स्थळ प्राप्त होते. आता तेथील कैलासलोकाची लक्षणे सांगतो
ऐक.
सर्व जीवांना सुखदायक, जो पार्वतीचा परमेश्वर, जो योग्यांचा योगेश्वर, असा तो शंकर कैलासात राहतो. तो आपल्या भक्तांना सदोदित अभय देणारा व वरदायक, त्रिविध तापांचा उच्छेद करणारा आणि तिन्ही लोकांना सुखी करणारा असा आहे. रामनामजपामध्येच जो आपल्या हातातील जपमाळा नेहमी तत्पर ठेवितो.
बळीचा पुत्र सहस्रबाहु बाणासुर, शृंगी, भृंगी, चंडी हे ज्याचे सेवक आहेत, यांशिवाय साठ हजार रुद्रगण लखलखीत कोयते व त्रिशूळ नेहमी हातात घेऊन असतात गणपती, कार्तिकस्वामी, नंदी, पंचमुख, षण्मुख आणि ज्याने दक्षाला शिक्षा केली होती असा सेनापती वीरभद्र भूत, प्रेत, पिशाच्च आणि मोठमोठे देव हेच ज्याचे सैन्य, असा तो शंकर असून हे सर्वजण शंकराचे आज्ञाधारक आहेत. ते नेहमी शिवनामाची गर्जना करीत असतात. शंभु, शिव, शूली, शंकर, उमाकांत, कर्पूरगौर, भव, भर्ग, भवानीपती, कपर्दी, ईश्वर, महादेव किंवा ‘हर हर शंकर’ ह्या नामोच्चाराच्या धाकानेच कळिकाळ दूर पळून जातो. कैलास पर्वत नेहमी शिवनामाचीच गर्जना करीत असतो आणि त्या ठिकाणी शंकर राज्य करतो. जेथे शिवनामाचा उच्चार होतो, तेथे शंकर आनंदाने राहतो. तो ईश्वर भक्तांसाठी मोठा कृपाळू असून भाविकांना नेहमी अगदी भोळेपणाने वश होणारा आहे.
सत्व, रज, तम हे तीन गुण आपल्या भक्तांचे शत्रु आहेत, म्हणून त्या त्रिगुणांचा संहार करण्याकरिताच त्याने हातात नेहमी त्रिशूळ धारण केलेला आहे. तो आपल्या डमरूच्या गजराने पातकाला पूर्णपणे नष्ट करतो. कैलास पर्वतावरील सर्व गवत, झाडे, पशु, पक्षी किंवा जे जे कोणी तेथे आहेत, ते ते सर्वजण शंकराचे आज्ञाधारक आहेत. किंबहुना त्या सर्वांच्या रूपाने शंकरच तेथे नांदतात! याप्रमाणे ब्रह्मांडाच्या बाहेर शंकरांनी आपल्याच लीलेने कैलास पर्वत निर्माण करून त्याची स्थापना केली आणि तेथेच भवानीसह ते राज्य
करतात.
आता वैकुंठातली स्थितीही तुला सांगतो, ऐक. वैकुंठलोकातील स्थिती ऐकताना चित्तवृत्ती स्वानंदस्फूर्तीने तुडुंब भरून वाहू लागते. ऊस पिळून त्याचा रस काढतात, तो आटवून त्याची साखर करतात आणि अत्यंत कुशल लोक तिचेही अनेक आकारांचे पदार्थ करतात त्याप्रमाणेच श्रीभगवंताने स्वतःच्या सामर्थ्याने राहाण्याकरिता खरोखर चैतन्यच मुशीत घालून आटवून त्याचेच तेथे वैकुंठ रचले असे म्हंटले तरी चालेल. चैतन्य मुशीत घालून त्याला निरनिराळे आकार दिल्यामुळे ते अधिकच सळसळू लागते तसेच वैकुंठाचे आहे.
क्रमशः