राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडण्याची शक्यता
राधानगरी तालुक्यातील काळम्मावाडी (दूध गंगानगर) येथील राजर्षी शाहू धरणात ७९.१८ टक्के (२०.१० टी.एम.सी) इतका पाणी साठा झाला आहे. गेले तीन दिवस झालेल्या जोरदार पावसामुळे धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढली आहे. धरणाची पाणी साठा क्षमता २५ टी.एम.सी. इतकी असल्याने धरण भरण्यासाठी आणखी कालावधी लागणार आहे. मात्र पुढील दक्षतेसाठी धरणाच्या वक्राकार दरवाजातून ४२५ क्युसेक व जल विद्युत केंद्रातून १००० क्युसेक असा १४२५ क्युसेक पाण्याचा विसर्ग दूधगंगा नदी पात्रात सुरू केला आहे. पावसाचे प्रमाण वाढल्यास पाण्याचा विसर्ग वाढवला जाणार असून नदीकाठच्या लोकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
काळम्मावाडी हे जिल्ह्यातील बहुतांशी भागाला व कर्नाटक पाणी पुरवठा करणारे धरण असून या वर्षी थोड्याच कालावधीत धरण परिक्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळला. त्यामुळे आज अखेर काळम्मावाडी धरण परिसरात १८६७ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तर आज ४८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. आज धरणाच्या जलाशयाची पाणी पातळी ६४१.३९ मीटर इतकी असून पाणीसाठा ६६९.२७१ द.ल.घ.मी म्हणजेच २०.१० टी.एम.सी. (७९..१८ टक्के ) इतका झाला आहे.
हेही वाचा- अलमट्टी धरण 95 टक्के भरले, 72 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु, कोल्हापूर जिल्ह्यात 58 बंधारे पाण्याखाली
राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडण्याची शक्यता
राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी सुरु असून धरणामध्ये पाण्याची आवक मोठया प्रमाणात सुरु असल्यामुळे आज रात्री उशिरा किंवा उद्या दिवसभरात राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडण्याची शक्यता आहे.त्यामुळे नदीच्या पाणी पातळी मध्ये मोठया प्रमाणात वाढ होऊ शकते.तरी नदीकाठावरील नागरिक तसेच स्थानिक प्रशासन यांनी सतर्कता बाळगावी असा इशारा जलंपदा विभागने दिला आहे.