केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दाखविला हिरवा झेंडा
प्रतिनिधी/ बेंगळूर
कलबुर्गी ते कोल्हापूर दरम्यान 428 कि. मी. पल्ल्याच्या रेल्वेला शुक्रवारी गुलबर्गा रेल्वे स्थानकावर हिरवा झेंडा दाखविण्यात आला. इतके दिवस सोलापूर-मिरज मार्गावर धावणारी एक्स्पेस आता याच मार्गावरून कलबुर्गी ते कोल्हापूर दरम्यान धावणार आहे. त्यामुळे कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवरील लोकांना अनुकूल होणार आहे.
कलबुर्गी रेल्वे स्थानकावर धारवाडचे खासदार, केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी, खासदार उमेश जाधव यांनी कलबुर्गी आणि छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर एक्स्पेसला चालना दिली. अनेक दिवसांपासून कोल्हापूर आणि कलबुर्गी जिल्हय़ातील जनतेकडून रेल्वेची मागणी करण्यात येत होती. कलबुर्गीचे खासदार उमेश जाधव यांनी देखील केंद्रीय मंत्र्यांकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.
कलबुर्गी स्थानकावरून दररोज सकाळी 6ः40 वाजता निघणारी रेल्वे दुपारी 2ः15 वाजता कोल्हापूरला पोहोचेल. तर कोल्हापूरवरून दुपारी 3ः00 वा. निघालेली रेल्वे त्याच दिवशी रात्री 10ः45 वाजता कलबुर्गीला पोहोचणार आहे. या रेल्वेमुळे गाणगापूर येथील दत्तात्रेय, पंढरपूर येथील विठ्ठल, कोल्हापूर महालक्ष्मी मंदिर या धार्मिक स्थळांना संपर्क साधणाऱया या रेल्वेसेवेमुळे भाविकांना अनुकूल होणार आहे.
कलबुर्गीवरून निघालेली रेल्वे सकाळी 7ः05 वाजता गाणगापूर, 7ः46 वाजता अक्कलकोट, 8ः25 वाजता सोलापूर, 9ः30 वाजता कुर्डूवाडी, 10ः20 वाजता पंढरपूर, दुपारी 12ः45 वाजता मिरज, 1ः10 वाजता जयसिंगपूर, 1ः25 वाजता हातकणंगले आणि तेथून पुढे कोल्हापूर स्थानकावर पोहोचणार आहे.
कोल्हापूरहून दुपारी निघालेली रेल्वे 3ः25 वाजता हातकणंगले रेल्वे स्थानकावर, 3ः40 वाजता जयसिंगपूर, सायंकाळी 4ः35 वाजता मिरज, 6ः45 वाजता पंढरपूर, 7ः40 वाजता कुर्डूवाडी, रात्री 8ः55 वाजता सोलापूर, 9ः32 वाजता अक्कलकोट, 10ः10 वाजता गाणगापूर आणि तेथून कलबुर्गीला पोहोचेल.