‘कश्चित्’ शब्दापासून ‘मेघदूत’ ह्या खंडकाव्याची सुरूवात झाली, तो श्लोक असा आहे.
कश्चित्कान्ताविरहगुरुणा स्वधिकारात्प्रमत्तः
शापेनास्तंगतमहिमा वर्षभोग्येण भर्तुः।
यक्षश्चपे जनटतनयास्नानपुण्योदकेषु
स्नग्धिच्छायातरुषु वसतिं रामगिर्याश्रमेषु।।1।।
अर्थात आपल्या कामगिरीत चुकलेला व म्हणून भार्येच्या विरहामुळे दुःसह झालेल्या, एक वर्षांपर्यंत सोडायच्या धन्याच्या शापामुळे ज्याचा प्रभाव किंवा शक्ती किंवा प्रभाव नष्ट केलेला कोणी एक यक्ष सीतेच्या स्नानामुळे पवित्र झालेले जलाशय असलेल्या, घनदाट छायेचे वृक्ष असलेल्या रामगिरीवरील आश्रमामध्ये वस्ती करायला लागला.
ह्यातील यक्ष म्हणजे देवयोनीतील जीव. कुबेराचे सेवक. कुबेराच्या खजिन्याच्या व उद्यानाच्या रक्षणाची जबाबदारी त्यांच्यावर असते. यक्षाकडे कोणती कामगिरी दिली होती हे श्लोकातून स्पष्ट होत नाही. परंतु अभ्यासकांनी विविध तर्क केलेत. काहींच्या तर्कानुसार यक्षाकडे रोज पहाटे कुबेराला शिवपूजेसाठी ताजी फुललेली फुले आणून देण्याची कामगिरी होती. पहाटे आपल्या पत्नीपासून दूर जायचे जड वाटत असल्याने एकदा त्याने रात्रीच फुले काढून ठेवली आणि पहाटे कुबेराला दिली. पण त्यातील एका फुलात लपलेला भुंगा अडकून पडला होता. तो कुबेराच्या बोटाला चावला. त्यामुळे कुबेराने संतापाने यक्षाला शाप दिला. तर कोणी म्हणतात यक्षाकडे उद्यान रक्षणाचे काम होते. पण चुकून आपली जागा सोडून दुसरीकडे गेला. तेव्हा त्याच रात्री इंद्राचा ऐरावत (हत्ती) उद्यानात घुसला आणि त्याने उद्यानाची नासधूस केली. म्हणून कुबेराने शाप दिला. तर काहींच्या मते कालिदासावर असा काही तरी प्रसंग आलेला असावा, त्याचाच वापर त्याने ह्या काव्यात केलेला असावा. ह्या श्लोकात ‘महिमा’ शब्द आलाय. त्याचा अर्थ मोठेपणा, वैभव, प्रभाव, शक्ती वगैरे आहेत. पण इथे अर्थाच्या दृष्टीने त्याचा प्रभाव किंवा शक्ती म्हणजे यक्षाची अदृश्यपणे इकडेतिकडे फिरण्याची आणि अंतर्ज्ञानाने सारे काही जाणण्याची शक्ती नष्ट झाली होती. तर ‘रामगिरी’ म्हणजे चित्रकूट असे मल्लीनाथ म्हणतो. तर कोणी नागपूरजवळील रामटेक असे म्हणतात. ‘आश्रमेषु’ हे बहुवचन आहे. म्हणजे अनेक आश्रमात. मग यक्षाला राहायला अनेक आश्रम कशाला? पण कदाचित पत्नीवियोगामुळे सैरभैर झालेला यक्ष एकाच ठिकाणी एकाच आश्रमात न राहता अनेक आश्रम त्याने बदलले असावेत. विरही माणसाची मनःस्थिती यात प्रतिबिंबित होते.