मागील श्लोकात कालिदासाचा शृंगाररसात भिजलेला, थोडासा अश्लिलतेकडे झुकल्यासारखा वाटणारा श्लोक पाहिला. यापुढील श्लोकात उन्हाने तापलेल्या जमिनीवर पहिल्या पावसाचे थेंब पडतात, तेव्हा जो सुगंध येतो, त्याला ते जमिनीने सोडलेले आनंदाचे निःश्वास वाटतात.
त्वन्नष्यिन्दोच्छ्वसितवसुधागन्धसंपर्करम्यः
स्त्राsतोरन्ध्रध्वनितसुभगं दन्तीभिःपीयमानः।
नीचैर्वास्यत्युपजिगमिषोर्देवपूर्वं गिरिं ते
शीतो वायुः परिणमयिता काननोदुम्बराणाम्।।42।।
अर्थः- तुझ्या वृष्टीमुळे आनंदाचे निःश्वास सोडणाऱया पृथ्वीच्या सुवासाच्या संपर्कामुळे मधुर वाटणारा, हत्तींनी आपल्या सोंडेच्या टोकांनी आनंदाने चित्कार करीत ग्रहण केलेला, अरण्यातील उंबरांची फळे पिकवणारा गार वारा देवगिरीला निघालेल्या तुझ्या खालून वहात जाईल. ह्यातील देवगिरी म्हणजे दक्षिणेकडील नव्हे, तर माळव्यात चंबळा नदीकाठी असलेले ‘देवगड’ नावाचे गाव असावे. कारण पुढील श्लोकात ह्या डोंगरावर कार्तिकेयाचे निवासस्थान असल्याचा उल्लेख आहे. त्याप्रमाणे ह्या गावात कार्तिकेयाचे देऊळ आहे.
ह्या श्लोकात स्वभावोक्ती अलंकार आहे.
तत्र स्कन्दं नियतवसतिं पुण्यमेघीकृतात्मा
पुष्पासारैः स्नपयतु भवान्व्योमगङ्गाजलादैः।
रक्षाहेतोर्नवशशिभृता वासवीनां चमूना-
मत्यादित्यं हुतवहमुखे संभृतं तद्धि तेजः।।43।।
अर्थः- तेथे देवगिरी पर्वतावर कायम वस्ती करून राहिलेल्या कार्तिकेयाला तू स्वतः पुष्पाचा मेघ बनून आकाशगंगेच्या जलाने ओल्या झालेल्या पुष्पांच्या वृष्टीने स्नान घाल. कारण ते तेज इंद्राच्या सैन्याचे रक्षण करण्याच्या हेतूने चंद्रशेखर शंकराने अग्नीच्या मुखात साठवलेले तेज सूर्यालाही मागे टाकणारे आहे.
यातील ‘पुष्पमेघीकृतात्मा’ शब्दाचा अर्थ मेघ कामरूप असल्याने त्याला पुष्परूप घेणे कठिण नाही….ह्याचा संदर्भ कार्तिकेय जन्माशीही आहे. मागील एका श्लोकात आपण ती पाहिलेली आहे. शंकराचा पुत्रच तारकासुराचा वध करील अशी आकाशवाणी झाल्यावर कामदेवाने आपल्या पुष्पबाणांनी शंकराचा तपोभंग केला. त्यानंतर त्यांचे वीर्य नदीत स्नान करणाऱया सहा कृत्तिकांनी धारण केल्याने सहा तोंडे असलेले बालक जन्माला आले. त्याला शंकरपार्वतींनी उचलून नेले आणि त्याचे नाव कार्तिकेय ठेवले. तो महापराक्रमी होता. पुढे त्याने तारकासुराचा वध करून सर्व देवांची त्याच्या तावडीतून सुटका केली….तोच हा स्कंद. ह्या स्कंदाची तीस नावे प्रज्ञावर्धन स्तोत्रात सांगितली आहेत.
मेघाला ते शंकराचेच तेज आहे असे सांगण्याचा हेतू म्हणजे त्याने स्कंदाला शंकराइतकेच पूज्य मानावे हा होय.