यक्षाने आपल्या पत्नीला मेघाची भावजय बनवले आणि त्याची खूप स्तुती केली. आर्जवे केली. त्यामुळे तो खुश होऊन आपले काम करण्यास नक्कीच तयार होणार, असे समजून त्याला आता पुढे काय काय करायचे आहे ते सांगण्यासाठी म्हणतो….
आपृच्छस्व प्रियसखममुं तुङ्गमालिङ्ग्य शैलम्
वद्यैः पुंसां रघुपतिपदैरङ्कितं मेखलासु।
काले काले भवति भवतो यस्य संयोगमेत्य
स्नेहव्यक्तिश्चिरविरहजं मुञ्चतो बाष्पमुष्णम्।।12।।
अर्थः-दरवषी पावसाळय़ात तुझी भेट झाल्यावर दीर्घकाळपर्यंत विरह घडल्याने उष्ण अश्रू ढाळणाऱया ज्याचा स्नेहभाव स्पष्ट होत आहे अशा, मध्यभागी लोकांना रघुपतिरायाच्या पायांची चिन्हे उमटलेली आहेत अशा, प्रिय मित्र अशा ह्या उत्तुंग पर्वताला कडकडून भेटून त्याचा निरोप घे.
वरील श्लोकात श्लेषालंकार किंवा अप्रस्तुतप्रशंसेचा वापर केला आहे.
मुञ्चतो बाष्पम्….ह्या ओळीतून पाऊस पडल्यावर पर्वतावरील झाडांवरून पाण्याचे थेंब खाली तप्त जमिनीवर पडून त्याची वाफ होते. त्यामुळे ठिबकणारे थेंबही उष्ण होतात. म्हणून कवी त्याला पर्वतांचे अश्रू म्हणतो.
यानंतर यक्ष मेघाला अलका नगरीला कुठून कसे जाशील याचा मार्ग सांगू लागतो.
मार्गं तावच्छ्रुणु कथयस्त्वत्प्रयाणानुरूपं
संदेशं मे तदनु जलद श्रोष्यषि श्रोत्रपेयम्।
खिन्नः खिन्नः शिखरिषु पदं न्यस्य गन्तासि यत्र
क्षीणः क्षीणः परिलघु पयः स्त्राsतसां चोपभुज्य।।13।।
अर्थः- हे घना, तुला ज्या मार्गाने अलकेस जायचे आहे, त्याचे आधी वर्णन ऐक. माझ्या पत्नीला सांगायचा निरोप मी मागाहून सांगतो. तू मुळीच विश्रांती घेऊ नकोस असे मी म्हणत नाही. तुला वाटेने जाताना श्रम झाले तर तू उंच उंच पर्वतावर विसावा घे आणि तहान लागली तर नद्यांचे गोड गोड पाणी पी. त्यानंतर तुला ज्या मार्गाने जायचे आहे तो तुझ्या प्रयाणाला योग्य असा मार्ग मी तुला सांगतो, तो ऐक.
ह्यातील ‘परिलघु पयः’ ह्या शब्दातून ध्वनित होणारा अर्थ असा आहे की, हा पहिलाच मेघ आहे. त्यामुळे सूर्याच्या उष्णतेने नद्यांच्या पाण्याची वाफ होतेच आहे. म्हणून परिलघु पयः याचा अर्थ ‘बाष्परूप असलेले हलके पाणी’ असा होऊ शकतो किंवा नद्यांतून हवेत उडणारे हलके जलतुषार असा होतो.
वरील श्लोकात स्वभावोक्ती अलंकार वापरला आहे.