उज्जैनीच्या वाडय़ांच्या गच्च्यांवरील सुंदर स्त्रिया पुरुषांना आपल्या नेत्रकटाक्षांनी मोहवतात म्हणून यक्षाला मेघही त्यांना भुलेल असे वाटते. म्हणून आडवळणाने तो मेघाला तिथे जास्त वेळ थांबू नको असे सांगतो. मात्र उज्जैनीला जाताना वाटेत मेघाला निर्विंध्या नावाची नदी वाहते, तिचा बेलाशक उपभोग घे असे यक्ष मेघाला सांगतो….
वीचिक्षोभस्तनितविहगश्रेणिकाञ्चीगुणायाः
संसर्पन्त्याः स्खलितसुभगं दर्शितावर्तनाभेः।
निर्विन्ध्यायाः पति भव रसाभ्यन्तरः सन्नपित्य
स्त्रीणामाद्यं प्रणयवचनं विभ्रमो हि प्रियेषु।।28।।
अर्थः- उज्जैनीच्या वाटेवर, लाटांच्या खळखळाटामुळे किलबिलाट करणारे पक्षी हाच कमरपट्टा असलेल्या, अडखळण्यामुळे मनोरमपणे वाहणाऱया, भोवरारूपी नाही असलेल्या, निर्विंध्या नदीचा रसास्वाद घे. कारण प्रियकराच्या बाबतीत शृंगारविभ्रम हेच स्त्रियांचे प्रेमाचे प्रकटीकरण आहे.
वरील श्लोकात निर्विंध्या नदीला सुंदर स्त्री मानून जणू आपल्या शृंगारभावांनी मेघाला आकर्षित केले आहे. त्यामुळे तू खुशाल तिचा उपभोग घे असे यक्ष सांगतो. म्हणजेच तिचे पाणी भरपूर प्राशन करून तृप्त हो असे सांगतो. कालिदास शृंगाररसाचे वर्णन किती रसिकतेने करतो,हे दिसून
येते.
निर्विंध्या नदीनंतर ‘सिंधु’ नदी लागते. ती तुझ्या विरहामुळे क़ृश झाली आहे. तिची कृशता वाहिनी करण्यासाठी पुढील श्लोकात यक्ष मेघाला विनवणी करतो.
वेणी भूतप्रतनुसलिला सा त्वतीतस्य सिन्धुः
पाण्डुच्छाया तटरुहतरुभ्रंशिभिजीर्णपर्णेः।
सौभाग्यंते सुभग विरहावस्थया व्यञ्जयन्ती
कार्श्यं येन त्यजति विदिशा स त्वयैवोपपाद्यः।।29।।
अर्थः- हे मेघा, थोडा थांब.वेणीप्रमाणे लहान प्रवाह झालेली, तीरावरील वृक्षांच्या गळून पडलेल्या जीर्ण पानांमुळे पांढुरक्मया झालेल्या प्रवाहामुळे व आपल्या विरहस्थितीमुळे तिला सोडून गेलेल्या, आपले सौभाग्य प्रकट करणाऱया सिंधु नदीची कृशता कमी होईल, असे काही तरी तू करावेस.
ह्या श्लोकातील सिंधु नदीला काला-सिंधु असेही म्हणतात. ती विंध्य पर्वतावर उगम पावते आणि उज्जैनी शहराजवळ चंबळा नदीला मिळते. सारोध्दारिणी आणि सुमतिविजय ह्यांनी सिंधु नदी माळव्यात असल्याचे सांगितले आहे.