मागील श्लोकात अलका नगरीतल्या स्त्रियांचा शृंगार हा नैसर्गिक पानाफुलांपासून केलेला असतो. संस्कृतचे विदेशी अभ्यासक विल्सन हे साध्या नैसर्गिक अलंकारांनी म्हणे मोहून गेले होते.
अलकानगरीत विविधरंगी आणि सुगंधी फुलांनी बहरलेले वृक्ष आणि इतर निसर्गशोभेचे वर्णन केले आहे.
यत्रोन्मत्तभ्रमरमुखराः पादपा नित्यपुष्पा
हंसश्रेणीरचितरशना नित्यपद्मा नलिन्यः।
केकोत्कण्ठा भवनशिखिनो नित्यभास्वत्कलापा
नित्यज्योत्स्नाः प्रतिहततमोवृत्तिरम्याः प्रदोषाः।।1।।
अर्थः-अलकानगरीतील वृक्ष नेहमी फुललेले असतात, त्यामुळे उन्मत्त मुंग्यांच्या गुंजारवांनी घेरलेले असतात. पुष्करिणी कमलपुष्पांनी नित्य बहरलेल्या असतात. त्यांच्याभोवती बसलेल्या हंसांची पंक्ती एखाद्या कमरपट्टय़ाप्रमाणे शोभून दिसते. तेथील पाळीव मोर केकारव करण्यासाठी उत्कंठित झालेले असतात. त्यांचा पिसारा सतेज दिसतो. रात्री नेहमी चांदण्यांनी फुललेल्या असल्याने काळोखाचे आवरण नष्ट झाल्याने आल्हाददायक असतात.
ह्या श्लोकावरून लौकिक अर्थाने जे विविध ऋतु आणि त्यानुसार जे सृष्टीत बदल होतात, तसे तिथे नसतातच मुळी. तिथे रात्रीही कायम चांदण्या असतात. मोरांचा पिसाराही गळून नवा येत नाही. तर तो कायम सतेजच असतो!
आनन्दोत्थं नयनसलिलं यत्र नान्यैर्निमितै-
नान्यस्तापः कुसुमशरजादिष्टसंयोगसाध्यात् ।
नाप्यन्यस्मात्प्रणयकलहाद्विप्रयोगोपपत्ति-
वित्तेशानां न च खलु वयो यौवनादन्यदस्ति ।।2।।
अर्थः- अलका नगरीत यक्षांच्या डोळय़ांत आनंदाने पाणी येत असते. इतर कोणत्याही कारणाने नाही. प्रेमकलहाशिवाय येथे कोणताही कलह नाही. तसेच यक्षांना यौवनाशिवाय दुसरी कोणतीही अवस्था नसते.
याचाच अर्थ यक्षांवर काळाचा कोणताही परिणाम होत नाही. माणसांप्रमाणे आनंद, दुःख इत्यादी विविध भावना नसून तिथे केवळ आनंदीआनंद असतो.
वरील श्लोक मूळ मेघदूतात नंतर घालण्यात आले आहेत, असे मल्लिनाथ म्हणतो. अशा श्लोकांचा प्रक्षिप्त म्हणतात. पण ‘पार्श्वाभ्युदय’ टीकाग्रंथात ते असून ‘विल्सन’ खेरीज सर्व टीकाकारांनी ते स्वीकारलेत. म्हणून ते येथे दिले आहेत.
मूळ ग्रंथातील पुढील श्लोक आपण पुढच्या भागात पाहू!