यत्र स्त्रीणां प्रियतमभुजालिङ्गनोच्छावासिताना-
मङ्गलानिं सुरतजनितां तन्तुजालावलम्बाः।
त्वत्संरोधापगमविशदैश्चन्दपादैर्निशीथे
व्यालुम्पन्ती स्फुटजललवस्यन्दनिश्चंद्रकान्ताः।।7।।
अर्थः- तेथे अलकानगरीत रात्रीच्या मध्यान्हीस, तुझा अडथळा दूर झाल्यामुळे निर्मळ झालेल्या चंद्रकिरणांच्या योगाने छतांच्या झालरीतून लोंबणाऱया चंद्रकांत मण्यांमधून मोठे जलबिंदू पाझरतात. त्यामुळे प्रियकरांच्या बाहूंच्या विळख्यात असलेल्या स्त्रियांचा रतिक्रीडेमुळे आलेला थकवा ते नाहिसा करतात.
इथे ‘उच्छवासित’ शब्दांचे घट्ट आवळलेल्या आणि सैल सोडलेला असे दोन्ही अर्थ होतात. परंतु मल्लिनाथाने त्यातील ‘सैल सोडलेला’ असा अर्थ विचारात न घेता दुसरा अर्थ घेतला आहे. ‘तन्तुजालः’ याचा अर्थ छतातील झालर असा घेतला आहे. पण सारोद्धारिणीने त्याजागी ‘यन्त्रजालः’ असा शब्दपाठ घेऊन त्याचा ‘जाळीचे पडदे’ असा अर्थ दिला आहे. ‘चंद्रकांत’ हा एक मणी असून, त्यावर चंद्रकिरण पडले की, तो पाझरू लागतो, अशी आख्यायिका आहे.
ह्या श्लोकात ‘उदात्त’ अलंकार वापरला आहे.
अक्षय्यान्तर्भवननिधयः प्रत्यंतर रक्तकण्ठै
रुद्रायद्भर्घिनपतियशः किन्नरैयत्र सार्धम्।
वैभ्राजाख्यं विबुधवनितावारमुख्यासहाया
बद्धालापा बहिरुपवनं कामिनो निर्विशन्ती।।8।।
अर्थः- तेथे अलकानगरीत ज्यांच्या घरात अक्षय संपत्ती साठलेली आहे, असे विलासी लोक, अप्सरा ह्याच कोणी वेश्या त्यांना समवेत घेऊन बोलण्यात गुंग होऊन, मधुर आवाजात कुबेराचे यशोगान करीत असलेल्या किन्नरांबरोबर नेहमी वैभ्राज नावाच्या बाह्योद्यानाचा उपभोग घेतात. यातील ‘विबुधवनिता’ म्हणजे देवांच्या स्त्रिया नाहीत. तर त्या अप्सराच आहेत. ‘वैभाज्राख्यम्’ म्हणजे विभ्राज नावाच्या शंकराच्या गणांनी रक्षण केलेले उद्यान. ते ‘चित्ररथ’ नावाच्या उद्यानाचेच दुसरे नाव आहे.अलकानगरीतील विलासी लोकांना उपभोगासाठी असणारी कोणतीही गोष्ट वर्ज्य नव्हती असेच यातून सांगितले आहे! सामान्य माणसाला अशा प्रकारच्या उपभोगाची, शृंगारांची कल्पनाही करता येत नाही. प्रतिस्वर्ग म्हणजेच अलका नगरी एवढेच आपण म्हणू शकतो!