मागे आपण विरहाचे चार प्रकार पाहिले. विरही लोकांचा दिवस कसाबसा जातो. पण रात्री इतक्मया दीर्घ वाटतात की, युगानुयुगे लोटली की काय असे वाटते. पुढील श्लोक पहा…
संक्षिप्येत क्षण इव कथं दीर्घयामा त्रियामा
सर्वावस्थास्वहरपि कथं मन्दमन्दातपं स्यात्।
इत्थं चेतश्चटुलनयने दुर्लभप्रार्थनं मे
गाढोष्माभिः कृतमशरणं त्वदियोगव्यथाभिः।।
अर्थः-दीर्घ प्रस्थानची रात्र क्षणाप्रमाणे कशी लहान होईल? दिवस कोणत्याही परिस्थितीत कमी तापदायक कसा होईल? अशा प्रकारे हे चंचलनयने! अप्राप्य मनोरथांनी भरलेले माझे मन अतितीव्र अशा विरहदुःखाने असहाय करून टाकले. त्याची अशी दुर्दशा ऐकून ती कदाचित घाबरेल म्हणून तो सांगतो….
नन्वात्मानं बहु विगणयन्नत्मनैवावलम्बे
तत्कल्याणि त्वमपि नितरां मागमः कातरत्वम्।
कस्यातन्तं सुखमुपनतं दुःखमेकान्ततो वा
नीचैर्गच्छत्युपरि च दशा चक्रनेमिक्रमेण।।
अर्थः-खरोखरच असे पुष्कळ मनोरथ करीत मी स्वतःच स्वतःला धीर देत असतो. म्हणूनच हे सुभगे! तूही घाबरून जाऊ नकोस. कारण शेवटपर्यंत सुख किंवा दुःख असे कोणाला लाभते का? कोणतीही दशा चाकाच्या धावेप्रमाणे खाली वर होत असते.(कधी सुख तर कधी दुःख असा ऊनपावसाचा खेळ चालू असतो.)
रहाटाच्या एका चक्राला पाणी वर काढण्यासाठी अनेक छोटे छोटे घडे बांधलेले असतात. त्या घडय़ांची माळ रहाटाचे चक्र जसजसे वरखाली फिरते तसतशी ती वर येताना पाणी घेऊन येते, खाली जाताना पाणी हौदात ओतून रिकामी होत पुन्हा खाली जाते. सुखदुःखाचेही तसेच आहे. भरलेले घडे म्हणजे सुख, तर रिकामे घडे दुःखाचे प्रतीक आहेत. आपल्या प्रियेला धीर धर म्हणून सांगण्यासाठी तो पुढील श्लोकात कारण देतो….
शापान्तो मे भुजगशयनादुस्थिते शार्ङ्गपाणौ
शेषान्मासान्गमय चतुरो लोचने मीलयित्वा।
पश्चादावां विरहगुणितं तं तमात्माभिलाषं
निर्वेक्ष्यावः परिणतशरश्चन्दकासु क्षपासु।।
अर्थः-विष्णु आपल्या शेषावरील निदेतून उठले म्हणजे माझा विरह संपेल. तेव्हा शिल्लक राहिलेले चार महिने डोळे मिटून काढ. नंतर मग आपण विरहामुळे वाढलेले आपले सर्व मनोरथ शरदातील स्वच्छ चांदण्यारात्री परिपूर्ण करू. भुजगशयनात्…..यात आषाढ शुद्ध एकादशीला विष्णु निजतात म्हणून तिला शयनी एकादशी व कार्तिक शुद्ध एकादशीला योगनिदेतून जागे होतात म्हणून तिला प्रबोधिनी एकादशी म्हणतात. हाच चातुर्मास होय.