अध्यक्षपदी पूनम पाटील, उपाध्यक्षपदी यल्लोजी पाटील यांची निवड
वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक
कंग्राळी बुद्रुक ग्राम पंचायतीच्या शुक्रवारी झालेल्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये ग्राम विकास आघाडीचे उमेदवार पूनम जयराम पाटील यांची अध्यक्षपदी तर यल्लोजी तानाजी पाटील यांची उपाध्यक्षपदी सर्वानुमते बिनविरोध झाल्यामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड होताच गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करत ग्रा. पं. सदस्य व कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.
यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून पीडब्ल्यूडी खात्याचे साहाय्यक अभियंता सुभाष नाईक, पीडीओ जी. आय. बर्गी व त्यांचे सहकारी उपस्थित होते. सकाळी 11.30 वाजता निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली. अध्यक्षपदासाठी पूनम जयराम पाटील यांचा एकच अर्ज आला होता. तर उपाध्यक्षपदासाठी यल्लोजी तानाजी पाटील व अनिता यल्लाप्पा पावशे असे दोन अर्ज आले होते. परंतु काही वेळाताच अनिता पावशे यांनी आपला अर्ज मागे घेतल्यामुळे अध्यक्षपदी पूनम पाटील तर उपाध्यक्षपदी यल्लोजी पाटील या दोघांची सर्वांनुमते बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक अधिकारी सुभाष नाईक व जी. आय. बर्गी यांनी घोषित केले. अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणूक बिनविरोध करण्यासाठी ग्रा. पं. सदस्य दत्ता पाटील, सद्याप्पा राजकट्टी, बंदेनवाज सय्यद, जयराम पाटील, दादासाहेब भदरगडे, सुरेश राठोडसह इतर सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी सर्व ग्रा. पं. सदस्य व सदस्या उपस्थित होत्या. ग्रा. पं. कर्मचारी यल्लाप्पा पाटील यांनी आभार मानले.
तीन महिने घुमत असलेले वातावरण झाले शांत
कंग्राळी बुद्रुक व गौंडवाड ही दोन्ही मिळून ही पंचायत आहे. कंग्राळी बुद्रुकमध्ये 11 प्रभाग तर गौंडवाडमध्ये 2 प्रभाग असे एकूण 13 प्रभाग आहेत. एकूण सदस्य संख्या 34 आहे. 2019-20 मध्ये ग्रा. पं. ची पंचवार्षिक निवडणूक झाली. त्यानंतर संध्या उमेश चौगुले व पूनम जयराम पाटील यांच्यामध्ये समान मते पडल्यामुळे चिठ्ठी काढून संध्या चौगुले यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तर अनिल यल्लाप्पा पावशे यांना 14 मते पडल्यामुळे पावशे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. या दोघांचा कार्यकाळ अडीच वर्षांचा होता. परंतु सव्वा वर्ष झाल्यानंतर अध्यक्ष-उपाध्यक्ष विकासकामे राबविण्यात अपयशी ठरत असल्याचे कारण करून 32 सदस्यांनी मागील महिन्यामध्ये या दोघांवर अविश्वास ठराव संमत केला होता. परत सव्वा वर्षासाठी पूनम पाटील यांची अध्यक्षपदी व यल्लोजी पाटील यांची उपाध्यक्षपदी सर्वानुमते निवड झाल्यामुळे तीन महिने घुमत असलेले वातावरण शांत झाल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.