28 रोजी राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन, वर्षभर विविध कार्यक्रम, माजी विद्यार्थिनींचा प्रातिनिधीक गौरव करणार
प्रतिनिधी /काणकोण
काणकोण तालुक्यातील शैक्षणिक संस्थाना ज्याने प्रोत्साहित केले आणि शिक्षणाचा पाया रचला ती चार रस्ता येथील सेंत्रु प्रोमोतोर द इस्त्रुसांव ही शैक्षणिक संस्था यंदा 100 व्या वर्षांत पदार्पण करत असून 28 रोजी या शतक महोत्सवाच्या उद्घाटन सोहळय़ाला गोव्याचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
सकाळी 10 वा. होणाऱया या समारंभाला काणकोणचे आमदार तथा सभापती रमेश तवडकर, काणकोणचे नगराध्यक्ष रमाकांत ना. गावकर तसेच निवृत्त ब्रिगेडियर आणि माजी खासदार तथा महाराष्ट्राच्या विधानपरिषदेचे सदस्य सुधीर सावंत हे उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती चार रस्ता येथील श्री मल्लिकार्जुन विद्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत शतक महोत्सवी कार्यक्रमांचे अध्यक्ष विकास देसाई यांनी दिली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष शांबा देसाई, आमसभेचे अध्यक्ष राजेंद्र देसाई, शतक महोत्सवी सोहळय़ाच्या विविध समित्यांचे पदाधिकारी अनिल के. देसाई, राम देसाई, पुंडलिक ना. गावकर, मनोज ना. गावकर, भानुदास ना. गावकर, रमेश कोमरपंत, प्रमोद राणे, बाबुसो गावकर, प्रेमानंद ना. गावकर, कमलाकर म्हाळशी, सोयरू कोमरपंत, अविन ना. गावकर हे उपस्थित होते.
तालुक्यातील पहिली शैक्षणिक संस्था
पोर्तुगीज काळात तालुक्यातील विविध भागांत मराठी शाळा चालू होत्या. त्यावेळी पोर्तुगीज शिक्षणासाठी 28 डिसेंबर, 1922 रोजी या संस्थेची स्थापना झाली आणि 21 ऑक्टोबर, 1923 रोजी संस्थेला सरकारी मान्यता मिळाली. त्यापूर्वी तालुक्यातील मुले फोंडा येथील आल्मेदा शाळेत शिकायला जात असत. मात्र टायफॉईडच्या साथीमुळे काणकोणचे दोन विद्यार्थी दगावले आणि गावात शिक्षणाची सोय करण्याची गरज त्यावेळच्या शिक्षणप्रेमींनी ओळखून या संस्थेची स्थापना केली, अशी माहिती विकास देसाई यांनी दिली. मुक्तीनंतर गावागावात शाळा सुरू झाल्या आणि या संस्थेच्या नेतृत्वाखाली शिक्षण नियामक समितीची स्थापना झाली. या संस्थेमार्फत तालुक्यातील चौथीपर्यंतच्या परीक्षा एकत्रित घेतल्या जायच्या, असे कमलाकर म्हाळशी यांनी सांगितले.
अल्पवेतनावर विद्यादान
एके काळी कोणाच्या घराच्या ओसरीवर, व्हरांडय़ात वर्ग घेतले जायचे. मासिक एक रुपया वेतनावर शिक्षक विद्यादान करायचे. त्यावेळी काणकोण नगरपालिका शाळा चालविण्यासाठी वर्षाला 350 रु., पर्तगाळ मठ 500 रु., तर श्रीस्थळचे श्री मल्लिकार्जुन देवस्थान 300 रु. अनुदान द्यायचे. त्यावर शाळा चालविली जायची, अशी माहिती शांबा देसाई यांनी दिली आणि काणकोण तालुक्यातील शैक्षणिक, सामाजिक उपक्रमांसाठी यापुढे देखील संस्था नेहमीच आघाडीवर असेल, असे स्पष्ट केले.
माजी विद्यार्थिनींचा गौरव करणार
मागच्या 100 वर्षांच्या कालावधीत या विद्यालयातून शिक्षण घेऊन पुढे आलेले शेकडो विद्यार्थी आज देश-विदेशांत उच्च पदांवर आहेत. एके काळी फोंडा येथे परीक्षेला जाण्यासाठी बैलगाडीचा वापर केला जायचा. ही बैलगाडी सावर्डेपर्यंत जायची. दुर्भाटमार्गे होडीतून फोंडा येथे जावे लागायचे. ज्या कुटुंबाकडून ही बैलगाडी चालविली जायची त्या कुटुंबाच्या प्रतिनिधींचा यंदा गौरव करण्यात येणार आहे. त्याचबरोबर या विद्यालयात शिकून पुढे येऊन उच्च शिक्षण घेतलेल्या महिलांचा प्रातिनिधीक स्वरूपात यंदा गौरव करण्यात येणार आहे.
त्यात डॉ. उमा यशवंत तिळवे उर्फ लालन नगर्सेकर, डॉ. सुलभा प्रमोद केणी उर्फ सुलभा शिवराय दलाल, श्रीमती युवेना फर्नांडिस, डॉ. सीमा चंद्रकांत परोब, डॉ. साधना भूतो देसाई उर्फ साधना शेटय़े, डॉ. सुविधा सुरेंद्र राणे उर्फ साक्षी नेवगी, मनीषा बाबुसो ना. गावकर उर्फ मनीषा पोवार, श्रीमती पांडुरंग फळदेसाई उर्फ पूर्णा प्रज्योत भगत आणि मल्लिका धिलोन देसाई या महिलांचा समावेश राहणार आहे.
आज या संस्थेतर्फे प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक वर्ग चालविण्यात येत आहेत. चार रस्ता येथील प्राथमिक शाळेत 135, माध्यमिक वर्गांत 300, तर उच्च माध्यमिक विद्यालयात 240 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. धुप्यामळ येथे संस्थेने पूर्वप्राथमिक शाळा सुरू केली आहे, तर आगोंद येथे लवकरच सुरू करण्यात येणार आहे. प्रत्येक गावात शाळा सुरू झाल्या. गावांतील शिक्षित लोकांचे मोठय़ा प्रमाणात शहरांत स्थलांतर झाले. सरकारने बालरथ योजना सुरू केली. काही शाळांनी वसतिगृहे सुरू केली. त्यामुळे या शाळेच्या पटसंख्येवर काही प्रमाणात परिणाम झाला, असे याप्रसंगी सांगण्यात आले.
माजी शिक्षकांच्या कार्याबद्दल कृतज्ञता
यावेळी विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक स्व. ह. रा. प्रभू, माजी शिक्षक स्व. यशवंत नायक आणि अन्य माजी मुख्याध्यापक व शिक्षकांच्या योगदानाचे स्मरण राजेंद्र देसाई यांनी केले. भविष्यकाळात गरज भासल्यास आणि जागा उपलब्ध झाल्यास संस्थेतर्फे वसतिगृह सुरू करण्याकडे लक्ष देण्यात येईल. या संस्थेने यापूर्वी तालुक्यात तांत्रिक शाळा, सरकारी उच्च माध्यमिक विद्यालय व मल्लिकार्जुन महाविद्यालयासाठी जागा उपलब्ध करून दिली. यापुढे देखील सामाजिक आणि शैक्षणिक कार्यासाठी संस्था सहकार्य करेल, असे शांबा देसाई यांनी स्पष्ट केले. यावेळी रमेश कोमरपंत, अनिल के. देसाई, बाबुसो ना. गावकर, राम देसाई, प्रमोद राणे यांनी संस्थेच्या गत शैक्षणिक उपक्रमांविषयी माहिती दिली.
वर्षभर शैक्षणिक कार्यक्रम राबविणार
शतक महोत्सवी वर्षाचे औचित्य धरून या संस्थेतर्फे वर्षभर विविध शैक्षणिक कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. त्याअंतर्गत तालुक्यातील सर्व शाळांचे संस्थाचालक, शिक्षकांसाठी खास मार्गदर्शन वर्ग घेण्यात येतील. या विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांसाठी खास कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. गोव्यात तसेच देश-विदेशात विविध ठिकाणी कार्यरत असलेल्या माजी विद्यार्थ्यांनी संस्थेची आर्थिक घडी बळकट करण्यासाठी आणि शतक महोत्सवी वर्ष यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन शतक महोत्सवी समितीने केले आहे.