प्रतिनिधी /बेळगाव
कपिलेश्वर मंदिराला दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते. यामुळे मंदिर आणि या ठिकाणी असलेल्या कपीलतीर्थाला महत्त्व प्राप्त झाले आहे. मात्र कपिलेश्वर तलावाची देखभाल करण्यास महापालिका प्रशासनाला अपयश आल्याने तलावाची दुरवस्था झाली आहे. टाकलेला कचरा काढण्यात आला नसल्याने कचरा कुजून परिसरात दुर्गंधी पसरली आहे.
कपीलतीर्थाला पवित्र मानले जाते. यामुळे पूजेसाठी वापरण्यात आलेली फुले आणि हार असे निर्माल्य कपीलतीर्थामध्ये विसर्जित करण्यात येते. पण तलावामधील पाणी दूषित होत असल्याने दुर्गंधी पसरत आहे. तलावातील पाणी वारंवार बदलणे महापालिकेला डोकेदुखी बनले आहे. तसेच तलावाचा दुरूपयोग होत असल्याने महापालिकेच्यावतीने तलावामध्ये पाणी भरण्याचे बंद करण्यात आले आहे. तर निर्माल्याचे विसर्जन करण्यासाठी निर्माल्य कुंड ठेवण्यात आले आहेत. मात्र नागरिक या कुडांचा वापर करण्याऐवजी तलावामध्ये निर्माल्य विसर्जित करतात. तलावामध्ये विसर्जित करण्यात आलेले निर्माल्य महापालिकेच्यावतीने काढण्यात येत नाही. परिणामी तलावाला कचरापुंडीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
निर्माल्य विसर्जित करण्यास प्रतिबंध करावा
कचऱयाची उचल वेळेत करण्याकडे महापालिकेच्या अधिकाऱयांनी कानाडोळा केला असून महापालिकेच्या कामकाजाबाबत नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. तलावामध्ये विसर्जित करण्यात आलेले निर्माल्य प्लास्टिक पिशव्यामध्ये भरून टाकण्यात येत आहे. यामुळे प्लास्टिकच्या पिशवीमध्ये कचरा कुजून दुर्गंधी पसरत आहे. विशेषतः पवित्र म्हणून पाहण्यात येणाऱया तलावाची दुरवस्था झाली असून याला महापालिकेचा आरोग्य विभाग जबाबदार असल्याची टीका नागरिक करीत आहेत. तलावामध्ये कचरा कुजत असल्याने नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. तलावाची स्वच्छता हाती घेऊन कपीलतीर्थाचे पावित्र्य जपावे. तसेच तलावामध्ये निर्माल्य विसर्जित करण्यास प्रतिबंध करावा अशी मागणी होत आहे.